Sushma Andhare : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नुकताच हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात अन्य जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू झाले, अशी टीका केली होती. यावरून आता शिवसेना ( ठाकरे गट ) सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाची मदत करायची असेल तर, उघडपणे करावी, आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही” असे म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीकास्र डागले आहे.
राज ठाकरेंनी,“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केलं,” तसेच “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचं मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर देताना, “आपल्याला वाटेल तेव्हा कधीही उठावं आणि विधानं करावीत. अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांवर फार बोलू नये. पण, भाजपाची मदत करायची, असेल तर उघडपणे करावी. आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही.” असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आणा. आम्ही मोफत रामलल्लाचे दर्शन घडवू, असे विधान गृहमंत्री अमित शाहांनी केले होते. यावर बोलताना सुषमा अंधारेंनी, “भारतातील लोक हे देवदर्शन स्वत:च्या पैशाने करू शकत नाहीत का? देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील, तर हे मोठं दुर्दैव आहे. हे इतके सर्व ताकदवान झाले आहेत का?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.