नवी दिल्ली – सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणामध्ये अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचलो नसून, प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरु आहे अशी माहिती आज सीबीआयतर्फे देण्यात आली आहे.
तत्पूर्वी, सुशांत मृत्यूप्रकरणामध्ये सीबीआयचा तपास कमालीचा मंदावला असून सर्व लक्ष अमली पदार्थ प्रकरणाकडे वाळवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांनी केला होता. यानंतर आज सीबीआय प्रवक्त्यांनी तपासाबाबत माहिती दिली आहे.
“केंद्रीय अन्वेषण विभाग सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा सर्वांगी तपास करत आहे. या मृत्यूप्रकरणाशी संबंधित सर्व पैलू तपासले जात असून आजपर्यंत कोणताही पैलू तपासातून हटवण्यात आलेला नाही.” अशी माहिती सीबीआय प्रवक्त्यांनी दिली.
७ वर्षांपूर्वी ‘काय पो चे’ या सुपरहिट चित्रपटातून सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण करणारा ३४ वर्षीय सुशांत १४ जूनला बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी मृत अवस्थेत सापडला होता.
यानंतर सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.
मात्र गत सप्ताहामध्ये सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांनी, सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास अचानक मंदावला असून सर्व लक्ष अमली पदार्थ प्रकरणाकडे वळवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सीबीआयतर्फे या प्रकरणाचा तपास सुरु असताना एकदाही पत्रकारपरिषद घेण्यात न आल्याची खंत बोलून दाखवत हे धक्कादायक असल्याचं म्हंटल होत.