नवी दिल्ली – देशातल्या पहिल्या दहा श्रीमंत उद्योगपतींमध्ये एकेकाळी समावेश असणारे अनिल अंबानी आज जवळपास दिवाळखोर झाले आहेत. आपल्याकडे आता केवळ एक लहान कार असून घरचेच आपला खर्च चालवातात. इतकेच काय तर वकीलांची फी देण्यासाठी दागिने विकावे लागले अशी माहिती खुद्द अनिल अंबानी यांनीच शुक्रवारी ब्रिटनच्या न्यायालयात दिली. त्यामुळे गेल्या काही काळात कधीकाळी श्रीमंत असलेले मात्र आता मोठ्या अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या चर्चा नव्याने सुरू झाल्या आहेत. या उद्योजकांबाबत थोडक्यात माहिती…
कॉफी डे चे मालक व्हि जी सिध्दार्थ:
माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि प्रख्यात कॉफी डेचे मालक व्हि जी सिध्दार्थ यांनी गेल्याच वर्षी आत्महत्या केली. देशभरात कॉफी डेची साखळी उभी करणारे सिध्दार्थ गेल्या काही काळात आर्थिक अडचणीत सापडले होते व त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस कर्जाच्या बोज्याखाली दबत गेला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतही आपल्या अडचणींचा आणि त्यातून बाहेर पडण्यात आलेल्या अपयशाचा उल्लेख केला होता. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या दबावाकडे त्यांनी अखेर बोट दर्शवले होते.
जेट एअरवेजचे नरेश गोयल:
जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांनी गेल्या वर्षी प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी स्वत:च 25 वर्षांपूर्वी जेटची स्थापना केली होती. वाढती स्पर्धा आणि कर्जाच्या बोजामुळे आलेल्या संकटातून मार्ग काढण्यात अपयश आल्यामुळे अखेर गोयल यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.
सहाराचे सुब्रत रॉय:
आकाश गाठल्यानंतर पुन्हा जमीनीवर यावे लागलेल्या उद्योगांत सहारा परिवाराचा समावेश होतो. सहाराश्री नावाने ओळखले जाणारे या समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना देणेकऱ्यांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली तुरूंगवारीही करावी लागली. प्रसारमाध्यमपासून ते विमा कंपनीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात सहाराने शिरकाव केला होता. मात्र त्यांना अनेक ठिकाणी अपयश येत गेले. आताही रॉय यांचा प्रयत्न सुरूच आहे.
रॅनबॅक्सिचे सिंह बंधु:
रॅनबॅक्सि ही प्रख्यात औषध कंपनी उभारून देशातल्या मोजक्या श्रीमंतांमध्ये स्थान पटकावणारे या कंपनीचे मलविंदी सिंह आणि शिविंदर सिंह हे बंधुही कपंनीचे शेअर्स विकल्यानंतर अडचणीत आले. या दोघांनी साडेनउ हजार कोटीला एका जपानी कंपनीला शेअर्स विकले होते. मात्र या रकमेतून त्यांना योग्य लाभ घेता आला नाही. एका माहितीनुसार त्यांनी यातून दोन हजार कोटींचे कर्ज चुकवले व करही भरला. त्यानंतर एका हॉस्पिटल चेनमध्ये अडीच हजार कोटींची गुंतवणूकही केली. पण ती अयशस्वी ठरल्याचे बोलले जाते.