उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र : कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई
उरुळी कांचन – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची कामात कसूर केल्याने तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबतचा लेखी आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रमेश चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 23) काढला. वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकांवर योग्य ते आतातरी उपचार होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम यांची फुरसुंगी तर डॉ. रुपाली लोखंडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे व फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे या दोघांची उरुळी कांचन येथील आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारून अहवाल सादर करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत.
हद्दीबाहेरील व्यक्तींचे विच्छेदन होणार का?
काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर येथील एका तरुणाने आत्महत्या केली होती. यावेळी मृत तरुणाचे ‘हद्दी’चे कारण देत शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. उरुळी कांचन पोलीस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव ग्रामपंचायतीने केल्याची माहिती कदम यांनी दिली होती; मात्र सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी असा कोणताही ठराव केला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हद्दवाद संपून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मृतदेहांचे आतात्तरी शवविच्छेदन होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कायम चर्चेत
मागील सहा महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीत पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. यावेळी त्या बालकाचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉ. सुचिता कदम व डॉ. संदीप सोनावणे यांना वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर तब्बल सात तासांनी शवविच्छेदन केले होते. मृतदेहाचे उशिरा शवविच्छेदन झाल्याने या प्रकरणी दोषी असलेल्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.
सोळाहून अधिक गावांसाठी केंद्र
हवेली तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रस्ता अपघात, आकस्मिक मृत्यू, रेल्वे अपघात, तसेच संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयातच जावे लागते. कायदेशीरदृष्ट्या तपासाच्या मुद्द्यावरून शवविच्छेदन ही बाब महत्वाची असते. मात्र, उरुळी कांचन हे पुणे सोलापूर महामार्गावरील सुमारे एक लाख व त्यापेक्षाजास्त लोकसंख्या असणारे उपनगर आहे.