– हर्षद कटारिया
निसर्गातील प्रत्येक सूक्ष्म जीवाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे आणि मानवाने कोणत्याही सूक्ष्म जीवाला त्रास होईल असे वर्तन करू नये याची शिकवण भगवान महावीरांनी दिली. निसर्गाचे लचके तोडण्याचे परिणाम मानव आज भोगत आहे. विश्वात कणाकणामध्ये जीवाचे अस्तित्व आहे हे मान्य करून कोणासही कोणत्याही प्रकारचे दुःख होईल अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये अशी जीवन पद्धती जगावी असा उपदेश वैशालीचे महापुत्र महावीरांनी दिला. स्वत:वर विजय मिळवित शरण जायचे तेही स्वत:लाच. प्रत्येक व्यक्तीला महावीर होण्याचा अधिकार आहे असे भगवान महावीर मानत…
सत्य हे स्वत:च शोधावे. त्यासाठी सुरवाताही स्वत:पासून करावी. अहिंसेचे पालन करणाऱ्या सर्व लोकांना मी जैनच समजतो असे महात्मा गांधी म्हणत असत. आज 21व्या शतकातही युवकांना अहिंसेची प्रेरणा देणारे शांतिमय आयुष्य जगण्यास प्रेरित करणारे महावीरांचे विचार प्रेरणा देतात. बिहारमधील वैशाली हे क्षेत्र भगवान महावीर यांची जन्मभूमी आहे. भगवान महावीरांचे विचार, शिकवण कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी नसून ते साऱ्या विश्वाला अहिंसेचा, शांतीचा, संयमाचा व माणुसकीचा विचार देणारे होते.
आजही भगवान महावीर यांचे विचार, शिकवण, सकारात्मक, शांतिप्रिय, अंहिसायुक्त जीवन जगण्यास प्रेरणा देतात. विश्वात कणाकणामध्ये जीवाचे अस्तित्व आहे हे मान्य करून कोणासही कोणत्याही प्रकारचे दुःख होईल अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, अशी जीवन पद्धती जगावी असा उपदेश वैशालीचे महापुत्र महावीरांनी दिला.
वाढत्या तंत्रज्ञानात आणि स्पर्धेच्या युगात तरुणांना नैराश्य येण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक संबध, शिक्षण, नोकरी याबाबत प्रचंड तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. वैचारिक पातळी खालावत आहे. मोबाइल गरज नव्हे, तर व्यसन बनत आहे. नव्या तंत्रज्ञानाला शाप म्हणावे की वरदान असा प्रश्न पडला आहे.
रागाचे प्रमाण वाढत असल्याने हिंसा वाढत आहे आणि बऱ्याच वेळा याचे रूपांतर विकृतीत होते. पैशाचा हव्यास, पैसाच सर्वस्व मानत मानवतेपासून दूर होऊ पाहणाऱ्या आजच्या पिढीला भगवान महावीर स्वामी यांचे विचार आजही नक्कीच अहिंसा व शांतिमय जीवन जगण्यास आदर्श ठरतील हे मात्र नक्की.
मनाचा समतोल ढासळू न देता शांत चित्ताने कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाणे ही कला अवगत होणे आत्मसाथ करणे आजच्या काळात गरजेचे आहे. भारतात अनेक संतांनी जन्म घेतला. भारताची भूमी पवित्र आहे कारण अनेक महान साधू संतांनी येथे जन्म घेतला. पवित्र इतिहास व वारसा असलेल्या भारतात आजही नैसर्गिक आपत्ती असो वा दुर्घटना जात-पात, गरीब- श्रीमंत हे भाव विसरून माणुसकीतून माणूस माणसाच्या मदतीला धावतो हिच आपली संस्कृती आहे. महावीरांनी हीच शिकवण दिली. त्यांचा माणसाच्या जातीवर नाही तर कर्मावर विश्वास होता. त्यांनी धन आणि सत्तेपेक्षा माणूस, माणुसकी त्या व्यक्तीने केलेले काम, त्याने केलेले श्रम याला प्रतिष्ठा दिली.
आजच्या काळातही भ्रष्टाचार, फसवणूक, पैशासाठी असलेली वखवख, सत्तेचा गैरवापर, घोटाळे यातही लोकशाही व्यवस्थेत आपण जगताना महावीर स्वामी यांच्या अनेकांतवादाची व महावीरांच्या उपदेशाची जोड़ जर लोकशाहिला मिळाली तर भारतात
सर्वोत्तम कारभार चालेल यात शंका नाही. कारण दुसऱ्यावर अनुशासन ठेवण्यापेक्षाही महत्वाचे आहे स्वत:वर अनुशासन ठेवत आरंभ करणे. कायम मार्गदर्शन करणारी महाविरांची विचारधारा सूर्यास्तापूर्वी जेवण करावे. रात्री सातच्या आत जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पाणी उकळून प्यायल्याने आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. या चांगल्या संकल्पना. त्याच्या मागील शास्त्रीय कारणे आजही आपण लक्षात घ्यायला हवीत. आज पाणी उकळून घेण्यापेक्षा आपण मिनरल घेतो.
याचाच अर्थ आपण आपल्या आरोग्याविषयी संवेदनशील आहोत असाच होतो. पूर्वीच्या काळी या सगळ्या सुविधा नव्हत्या. आणि आता ह्या सुविधा उपलब्ध आहेत. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजेच भगवान महावीरांनी दिलेली आचारसंहिता ही शास्त्रीय दृष्ट्या बरोबर सिद्ध झाली आहे. काळ कितीही पुढे गेला तरी भगवान महावीरांनी दिलेली तत्वे, सिद्धांत, आचारसंहिता ही कायम लोकांसाठी, समाजासाठी जास्तीत जास्त मूल्यवान ठरणारच आहे. आणि त्यामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदतच होणार आहे. या मूल्यांमुळे समाजात लोकांना निरोगी आरोग्य, मानसिक शांतता एवं स्थिरता राहण्यास मदत होणार आहे. आणि ही विचारधारा मानवाला चिरकाल मार्गदर्शन करीत राहणार आहे.
भगवान महावीर यांनी जिनदीक्षा घेण्याआधीच्या काळात गावात एक हत्तीने धुमाकूळ घातला होता. त्याने दिसेल त्याला तुडवत गावात मोठे नुकसान केले. ही माहिती मिळताच महावीरांनी तेथे जाऊन हत्तीला शांत केले. गावकऱ्यांनी महावीरांचा जयजयकार केला. त्यावेळी महावीरांनी गावकऱ्यांना प्रबोधित करत सांगितले की पशुला जिकंण्यापेक्षा स्वत:ला जिकंण्यात खरी वीरता आहे.
आपल्या राष्ट्रीय अस्मितेला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देण्याचे काम महावीरांनी केले. भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशामुळे संपूर्ण जगाला सकारात्मक प्रेरणा व शांतिने जीवन जगण्याची कला मिळाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व महावीरांच्या प्रवचनामध्ये एकवटले आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होते. ते 28 वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले. वयाच्या 30 व्या वर्षी तारुण्यांत त्यांनी जिनदीक्षा घेतली. ऐश्वर्य , घर, नाती सोडून त्यांचा त्याग केला. घनदाट जंगलात ध्यानस्त राहून तप केले. तपाच्या सहाय्याने ते आत्मज्ञानी बनले. त्यांनी स्वत:वर विजय मिळविला. अहिंसा हा महावीरांचा आधारभूत सिध्दांत आहे. भूतदया हे महावीरांच्या जैन धर्माचे मुख्य तत्व आहे. जगा आणि जगु दया हा महान सिध्दांत महावीरांनी सांगितला आणि विश्वात अहिंसेचा प्रसार केला. भगवान महावीरांनी वेद,कर्मकांड, यज्ञामध्ये होणारी पशूंची निर्घृण हत्या या प्रथेचा तीव्र विरोध केला.अहिंसेच्या तत्वाला महावीरांनी विशेष महत्त्व दिले.
भगवान महावीर यांची जगा आणि जगु दया, अहिंसा, अनेकांतवाद या उपदेशांची शिकवण मानणाऱ्या सर्व आनुयायांनी अहिंसावादी व आदर्शदायी भविष्यासाठी आजच्या परिस्थितीत एकत्र येणे गरजेचे आहे.
‘फ़क्त मीच तो खरा ‘ हा अट्टाहास जेव्हा माणसामधून कमी होतो तेव्हाच प्रेम, आपुलकी व जिव्हाळा यांना जागा मिळू शकते हीच महावीरांची शिकवण होती.