– डॉ. महावीर अक्कोळे
तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या निर्वाणास उणीपुरी दोनशे वर्षेही झाली नव्हती तेव्हा अहिंसेचा प्रभाव कमी होऊन विषमता, अशांतता, कर्मकांडाचा अतिरेक, यज्ञातील पशुबळी यांचे प्रमाण वाढले आणि अराजक सदृश परिस्थिती होऊन जनता परत नेतृत्वाच्या सूर्योदयाची प्रतीक्षा करू लागली होती. वैशाली गणतंत्राचे अधिपती राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांना नंदिवर्धन नावाचा एक पुत्र होता आणि आता पुन्हा राणी त्रिशला गर्भवती होत्या. गर्भावस्थेत त्यांना अर्धजागृतावस्थेत सोळा स्वप्ने पडली.
ही स्वप्ने पाहून त्या जाग्या झाल्या नि सिद्धार्थांना उठवून सांगू लागल्या- आजची रात्र माझ्या जीवनात अपूर्व अशी आहे, मन प्रसन्न वाटते आहे नि चोहीकडे अद्भुत प्रकाश दिसतो आहे. मग राणीने ती सोळा स्वप्ने राजास सांगितली. ती सोळा स्वप्ने अशी – हत्ती, बैल, सिंह, लक्ष्मीला दोन माळा, चंद्र, कुर्म, दोन कुंभ, दोन मासे, समुद्र, सरोवर, सिंहासन, देवविमान, नागविमान, रत्नसमूह आणि धूम्ररहित अग्नी!
दुसऱ्या दिवशी अष्टांगनिर्मित जाणणाऱ्या स्वप्नपाठकांनी राजाने आमंत्रित केल्यानुसार दरबारात येऊन स्वप्नांचा अर्थ लावून विश्लेषण केले की- राणी ज्या पुत्ररत्नास जन्म देणार आहे तो “चक्रवर्ती’ असेल; पण तो वैशाली गणतंत्राची समाप्ती करणारा चक्रवर्ती असणार नाही तर तो “धर्मचक्रवर्ती’ असणार आहे. आपला पुत्र अहिंसा, स्वतंत्रता, सापेक्षता, सहजीवन आणि अपरिग्रह या सिद्धांताचा यशस्वी प्रवक्ता आणि महान सूत्रकार होईल. महाराजांनी या स्वप्नपाठकांस मौल्यवान उपहार देऊन परत पाठवले.
स्वप्नपाठकांनी त्रिशलामातेच्या सगळ्या सोळा स्वप्नांचे काय अर्थ लावायचे ते लावले; पण मला स्वतःला आता त्रिशलामातेचे “धूम्रविरहित अग्नी’ हे स्वप्न भावले, अर्थपूर्ण वाटले. किती सुंदर कल्पना आहे ही…! अग्नी तर आहे; पण तो धूर नसलेला… अग्नीचे तेज आहे, तप्तपणा आहे… प्रकाश आहे; पण नको असलेला धूर मात्र नाही…! ऊर्जेचा स्रोत आहे; पण त्यापासून होणारे प्रदूषण नाही. एक टोकाची पर्यावरणपूरक, आत्यंतिक प्रदूषणमुक्त पर्यावरणाची स्थिती दर्शविणारी, “एक्स्ट्रीमली इकोफ्रेण्डली’ कल्पना भगवान महावीरांच्या मातेने तिच्या गर्भावस्थेत स्वप्नात पाहिली. कदाचित या जगाच्या भविष्यातला ध्यास तिला तेव्हाच कळला होता.
आजच्या विज्ञानाचा, शास्त्राचा, शास्त्रज्ञांचा ध्याससुद्धा हाच आहे. प्रदूषणमुक्त- अगदी टोकाची प्रदूषणमुक्त ऊर्जा. याच ध्यासापोटी जगभराचे संशोधक रात्रीचा दिवस करताहेत. अजून या ध्यासाला यश मिळालेले नाही; पण मिळणार, हेही नक्की आहे. म्हणजे प्रदूषणमुक्त स्वच्छ पर्यावरणाचे व अशा पर्यावरणाचे पावित्र्य राखून मानवाला हव्या असलेल्या ऊर्जेची निर्मिती करण्याचे संदर्भ अशा रीतीने भगवान महावीरांच्या चरित्राच्या रूपाने जैन संस्कृतीत सापडतात.
पर्यावरण रक्षणाचे मूलमंत्र म्हणावे असे जैन तत्त्वज्ञानातले वचन म्हणजे- “जगा आणि जगू द्या!’ भगवान महावीर त्यांच्या हितोपदेशात म्हणतात,
“”स्वतःच्या सुखासाठी जो मनुष्य त्रस्त व स्थावर प्राण्यांची क्रूरपणे हिंसा करतो- त्यांना अनेक प्रकारे त्रास देतो, जो दुसऱ्यांच्या वस्तूंचे अपहरण करतो, जो आदरणीय अशा व्रतांचे थोडेही आचरण करीत नाही, अशा मनुष्याला क्लेशच भोगावे लागतात.”
भगवान महावीरांनी नेमक्या शब्दांत आजच्या मानवाच्या कर्माची व त्याच्या परिणामांची गाथा बांधली आहे. महावीर म्हणतात, “”दुसऱ्याने न दिलेली वस्तू कधीही घेऊ नये. सर्व प्राणिमात्रांबरोबर संयमाने वागावे. जगात राहणाऱ्या त्रस्त आणि स्थावर प्राणिमात्रांना, त्यांच्याकडून त्रास झाला तरी (आपण काया-वाचा-मने अगर कोणत्याही अन्य मार्गे) दुखवू नये. त्यांना दंड देऊ नये.”
पर्यावरण रक्षणाचा- पर्यावरण संवर्धनाचा खूप मोलाचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. ज्ञानेश्वरीतील पसायदानाप्रमाणे भगवान महावीर जगासाठी शुभाशय व्यक्त करतात-
“”सर्व जनतेला सुखशांती लाभो, राजे लोक धर्मानुरागी होऊन प्रभावनापूर्वक प्रजेचा सांभाळ करोत. वेळोवेळी योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी होवो, या जगात दुष्काळाचा नामोनिशाण न राहो. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव न होवो. अशा प्रकारे सर्वांना सुख प्रदान करत जिनेंद्र भगवंतांचे धर्मचक्र सतत परिक्रमण करीत राहो…!”