मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरुपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटविण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई इनकम टॅक्स विभागाने हा निर्णय घेतला आहे.
गुरू कमॉडिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेवरचे जप्तीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना आणि जमीन तसेच इमारतीचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील चिमणगाव येथील मालमत्तेवरच्या जप्तीचे आदेशही मागे घेण्यात आले आहेत. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला होता.
याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. तसेच या गुन्ह्यावर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाई केली होती.