मध्य प्रदेश – दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 3 चित्त्यांचा मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू झाला आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणे योग्य नसून त्यांचा अन्य ठिकाणी देखील बंदोबस्त केला पाहिजे, असे सुचवले आहे. यावेळी न्यायालयाने चित्त्यांच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली आहे.
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, “चित्ते बऱ्याच काळानंतर भारतात आणले गेले. त्यांना एकाच ठिकाणी ठेवल्यास प्रत्येकाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा पर्यायी अभयारण्यात बंदोबस्त केला पाहिजे. ते मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रातील अभयारण्यात नेले जाऊ शकतात.” यावेळी न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेली मादी चित्ता भारत सरकारने का स्विकारली? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.
केंद्र सरकार काय म्हणाले?
3 चित्त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे. मात्र यातील एका चित्त्याचा आजारानं मृत्यू झाला. तर इतरांचा मारामारीत जखमी होऊन मृत्यू झाला आहे. कुनोच्या वातावरणात चित्ते आरामात राहतात. यावेळी मादी चित्त्यानं चार बछड्यांना जन्म दिल्याचंही सरकारनं सांगितलं. चित्ता प्रकल्पाचं हे मोठं यश आहे, असे न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यत आले.
केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, जवळपास 75 वर्षांपासून चित्ते भारतात नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांची अजूनही कमतरता आहेच. त्यांच्या संरक्षणासाठी सरकार सध्या अनेक उपायांवर विचार करत आहे. यामध्ये त्यांना इतर अभयारण्यात स्थायिक करण्याचा विचार आहेच. राजस्थानचे मुकुंद्रा राष्ट्रीय उद्यान यासाठी सज्ज झाले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात आणखी एका अभयारण्याचा विचार सुरू आहे.
याप्रकरणी न्यायालयाने चित्त्यांबाबत 3 सदस्यीय तज्ज्ञ समितीला 15 दिवसांत नॅशनल टास्क फोर्सला आपल्या सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 17 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील 3 चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.