नगर -संकट काळात गरजूला मदत करणे व अडचणीत आधार देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. याच तत्वज्ञानानुसार जैन ओसवाल वात्सल्य संस्था अविरतपणे कार्य करीत आहे. या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळणे हे भाग्यच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी केले.
जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्यावतीने समाजातील गरजूंना अन्नधान्य रुपाने किराणा मालाची मदत नुकतीच करण्यात आली. यावेळी महेश गुंदेचा व स्वाती गुंदेचा, चंपालाल मुथा (ओडणावाला), जैन वात्सल्य संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सचिव विजय गुगळे, जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष ईश्वर बोरा, विनोद चंगेडिया, नंदलाल कोठारी, महेश गुगळे, मूळचंद डागा आदी उपस्थित होते.
यावेळी मुथा म्हणाले की, समाजात एकीकडे संपन्नता तर दुसरीकडे गरीबी आहे. ही दरी दूर करायची झाल्यास प्रत्येकाने गरजवंतांचा विचार करून शक्य तितकी मदत केली पाहिजे.
जैन वात्सल्य संस्था नावाप्रमाणेच वात्सल्यपूर्ण सेवा देत असून दर महिन्याला अनेकांना या उपक्रमातून जगण्याचा आधार मिळत आहे. संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले. स्वाती गुंदेचा म्हणाल्या की, आजच्या काळात सेवाभावी वृत्ती असणे खूप गरजेचे बनले आहे. जैन वात्सल्यसारख्या संस्था समाजातील वंचितांसाठी कार्य करताना आदर्श निर्माण करीत आहेत. या संस्थांना मदत करताना नेहमीच आनंद होतो.