धरणामध्ये 72 टक्के पाणीसाठा ः शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली
भाटघर -मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाटघर धरण 72 टक्के पाण्याने भरलेले असल्याने यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा भासणार नाही. यामुळे पूर्व भागातील शेतकरीवर्गाची शेती पाणी सिंचनाची चिंता मिटली असून, स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही.
यावर्षी पाऊस जोरदार झाल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील बरीचशी धरणे तुडुंब भरलेली होती. भाटघर धरण 4 ऑगस्ट 2019 ला दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान शंभर टक्के भरले होते. नीरा देवघर धरण व भाटघर धरण ही दोन्ही धरणे भरल्यानंतर धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.
यामुळे वीर धरणाच्या पाण्याला प्रचंड फुगवठा आल्याने नीरा नदी पात्रातही पाण्याचा फुगवठा निर्माण झाला.यावेळी भाटघर जलविद्युत केंद्रात पाणी शिरले होते. जलविद्युत केंद्रामधील दुरुस्तीचे काम सद्यःस्थितीत चालू असून आतापर्यंत वीज निर्मिती बंद आहे. यावर्षी पावसाने अधिक काळ हजेरी लावल्याने फेब्रुवारी महिना उलटला तरी धरण 72 टक्के पाण्याने भरलेले आहे.