पराग शेणोलकर
मुख्याधिकाऱ्यांची तलवार म्यान; म्हणे, फोल्डिंगच्या पायऱ्या करा
कराड – तब्बल 20 वर्षानंतर कराड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. हजारो अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा टाकला. मात्र, या मोहिमेत पक्षपातीपणा व अन्याय झाल्याचा आरोप करत व्यापारी व सामाजिक संघटना मोहिमेविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी शहरातील व्यापाऱ्यांना दुकानांसमोरील गटर स्वच्छ ठेवण्यासाठी उघडझाप होणाऱ्या पायऱ्या करा, असे आवाहन केले.
मात्र, मुळातच गटर स्वच्छतेसाठी जागा असताना दुकानांच्या पायऱ्या का तोडल्या? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. फोल्डींगच्या पायऱ्या करणे म्हणजे अतिक्रमण नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. शहरातील वाढता दबाव लक्षात घेऊन मुख्याधिकारी डांगे यांनी अखेर आपली तलवार म्यान केल्याची शहरात चर्चा आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेस 26 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या पोलीस फाट्यासह येथील विजय दिवस चौकातून प्रारंभ झाला. बसस्थानक परिसर, दत्त चौक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली.
सलग चार दिवस सुरू असलेल्या या मोहिमेत कृष्णा नाका, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसर, दत्त चौक मार्गे शाहू चौक, कोल्हापूर नाका ते पुन्हा मुख्य बाजारपेठेतील आझाद चौक, चावडी चौक, भाजीमंडई परिसरासह विविध ठिकाणी ही मोहीम पार पडली. या मोहिमेत रस्त्यालगतची अतिक्रमणे व होर्डिंग मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईचा धडाका लक्षात घेऊन काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली होती.
मोठे होर्डिंग गॅस कटरने कट करून ती जमीनदोस्त करण्यात आली. ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून प्रतिसाद दिला नाही, त्या दुकानांवर थेट जेसीबी चालवण्यात आला. अनधिकृत उभे केलेले पत्र्याचे शेड, टप्प्यांवरील शेड तसेच अनधिकृत कट्टे, पायऱ्या फोडण्यात आल्या आहेत. अतिक्रमण मोहिमेची तीव्रता जसजशी वाढू लागली.
तसतसे शहरातील व्यापाऱ्यांनी मोहिमेचा धसकाच घेतला. मात्र, मोहिमेदरम्यान नाल्यांवर असणारे कठडे, पायऱ्या यांच्यासह वाहतुकीसह कोणताही अडसर नसणारे दुकांनाचे बोर्डही जेसिबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले. अनेक ठिकाणी पक्षपातीपणे अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. काही सामाजिक संघटनाही त्यांच्या मदतीला धावून आल्या.
व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून पालिका व पोलीस प्रशासनाला व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याबाबतचे निवेदन दिले. पालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट मोडतोड करत लाखोंचे नुकसान केल्याचा आरोप केला. काही ठिकाणी वादावादी झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
त्यामुळे अतिक्रमण मोहीमेत शहरातील ठिकठिकणी पडले साहित्य उचलण्याच्या नावाखाली अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली.
रस्त्यावरील राडारोडा उचलल्यानंतर पुन्हा मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते.
मात्र, अजूनही मोहीम हाती घेण्यात आलेली नाही. उलट व्यापाऱ्यांनी केलेल्या उठावासमोर नांगी टाकत पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी दुकानांसमोरील पायऱ्यांचे पक्के बांधकाम मोठ्या लांबीचे करू नये, गटर स्वच्छतेकरिता ठिकठिकाणी जागा ठेवाव्यात, उघडझाप होणाऱ्या पायऱ्या कराव्यात, दुकानांचे फलक रस्त्यावर लावून नयेत. ज्या व्यापाऱ्यांना त्यांच्या खासगी जागेत फलक लावायचे आहेत, त्यांनी पालिकेकडून ना हरकत दाखला घ्यावा, अशी नियमावली घालून प्रसिध्दीपत्रक काढले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या उठावाला यश आले असून अतिक्रमण मोहिमेला ब्रेक लागला आहे.
पालिका नुकसान भरपाई देणार का?
शहरातील व्यापारी हा शहराचा नागरिक आहे, तसा तो मतदारही आहे. तसेच व्यावसायिक कराच्या रूपाने पालिकेला सर्वात जास्त कर भरणारा प्रमुख घटक आहे. असे असतानाही त्यांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता थेट दुकांनाच्या पायऱ्या व त्यांच्या मालकी हक्काच्या जागेतील बोर्ड काढण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यात व्यापाऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई पालिका देणार का? अशी विचारणा होत आहे.
ती अतिक्रमणे मुख्याधिकारी काढणार?
कराड शहरातील अतिक्रमणे काढताना दुजाभाव झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. यावर शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर अशी अतिक्रमणे पंधरा दिवसात काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी डांगे यांनी दिले होते. त्यामुळे ज्यांची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. ते आता संबंधित अतिक्रमणे काढली जाणार का? याकडे लक्ष ठेवून आहेत.