केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्निपथ योजनेवरून सध्या गदारोळ सुरु आहे. सैन्य दलातील सेवेबाबत असलेल्या या योजनेद्वारे तरुणांना ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केले जाणार असून यातील २५ टक्के जवानांची सेवा पुढे सुरु ठेवण्यात येईल. सैन्य भरतीसाठी वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र या योजनेला विरोध वाढताना दिसतोय. अशातच आज हरियाणाच्या रोहतकमधील एका पीजी हॉस्टेलमध्ये सचिन नावाच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्त्या केली.
सचिन जींद येथील लिजवानाचा रहिवासी असून त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सैन्यात भरती व्हायचे होते, यासाठी तो खूप मेहनत घेत होता, असे समजले.
लष्करात भरतीसाठी दोनदा क्वालिफाय मात्र…
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या मामाहितीनुसार, सकाळी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणांनी सचिनचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
सचिन सोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणाने मीडियाला सांगितले की, लष्करात भरतीसाठी तो दोनदा क्वालिफाय झाला होता. मात्र, भरती झाली नाही. यामुळे तो त्रस्त होता.
केंद्राच्या अग्निपथ या सैन्यात ४ वर्षांसाठी भरतीच्या योजनेवरून पाच राज्यांत मोठा गोंधळ उडाला आहे. संतप्त झालेल्या तरुणांनी विविध ठिकाणी काही ट्रेनचे डबेदेखील जाळले आहेत. तसेच दगडफेक आणि हिंसाचारही सुरु झाला आहे. चार वर्षांनी पुढे काय, असा प्रश्न हे तरुण विचारत आहेत.