चंदिगढ – केंद्र सरकारकडून सैन्य भरतीसाठी अग्निपथ ही नवीन योजना घोषित करण्यात आली. मात्र, या योजनेला उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेशसह पंजाबमधील तरुणांनी कडाडून विरोध केला. तसेच अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून केंद्राच्या योजनेविरोधात आंदोलने केली. काही ठिकाणी जाळपोळीसह, हिंसाचाराच्या घटना घडल्या. अशात पंजाब विधानसभेने गुरुवारी केंद्राच्या अग्निपथ सैन्य भरती योजनेविरोधात ठराव मंजूर केला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना मान म्हणाले की, अग्निपथ योजनेचा मुद्दा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडणार आहे. अग्निपथ ही योजना देशातील तरुणांच्या विरोधात आहे.
मात्र विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे आमदार प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली आहे. अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत ही योजना मागे घेण्याची मागणी केली आहे.