नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत अग्निपथ योजनेविषयी तपशीलवार माहिती दिली. मात्र, समाधान न झालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस या विरोधी पक्षांच्या खासदारांनी ती योजना तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश असणाऱ्या समितीच्या बैठकीला राजनाथ यांच्याबरोबरच तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख उपस्थित राहिले. त्यांनी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत अग्निपथविषयी उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. खासदारांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
मात्र, विरोधी पक्षांच्या खासदारांचे समाधान झाले नाही. त्यांनी योजनेवर आक्षेप घेत ती मागे घेण्याची मागणी कायम ठेवली. कॉंग्रेसचे खासदार शक्तिसिंह गोहील यांनी संरक्षण क्षेत्रातील तज्ञांकडून योजनेवर टीका होत असल्याकडे लक्ष वेधले. त्या योजनेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होईल. तसेच, संरक्षण दलांच्या मानसिक धैर्यावर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गोहील यांनी मांडलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी पाठिंबा दर्शवला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी करणारे लेखी पत्रही बैठकीत राजनाथ यांच्याकडे सादर केले.
Attended the Consultative Committee Meeting for the Ministry of Defence today in New Delhi. There were widespread protests across the country after the Government of India launched the Agnipath Scheme. pic.twitter.com/vnvqJI7eVt
— Supriya Sule (@supriya_sule) July 11, 2022