पुणे – हडपसर, मांजरी आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांतील काही भागांत “कोयता गॅंग’ने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हेगार रात्री-अपरात्री कोयता दाखवून चोरी, वाहनांची तोडफोड, लुटमार करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ मोक्का लावा, तडिपार करा, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. सध्या शहर आणि इतर परिसरात कोयता गँगने प्रचंड धुडगूस घातला असून, सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गॅंगमधील काही गुंडांच्या पोलिसांनी देखील मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या समोर या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठीच मोठं आव्हान असून यासाठी आता त्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. शहरात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कारवाही केल्यास पोलिसांना बक्षी देण्यात येणार आहे. “कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा..’, अशी मोहीम सध्या पुणे पोलिसांनी राबवली आहे. मात्र, आता या योजनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
“पोलिसांना जर बक्षिसांचं आमिष दाखवायला लागला तर कठीण होईल. त्यामुळे पोलिसांनी नवे पायंडे पाडू नये’, अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले की, “एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवे पायंडे पाडू नये. आरोपींना पकडणं पोलिसांचं काम आहे. कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं आणि सगळ्या गुन्ह्यांसंर्भात माहिती ठेवणं देखील पोलिसांचं काम आहे’. असं अजित पवार म्हणाले.