माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी सहकारी बॅंक या दोन संस्था अनेक महिलांच्या जगण्याचा आधार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेले. माळशिरसजवळील इस्लामपूर (जि. सोलापूर) येथील प्रमिला धाइंजे यांनीही माणदेशीच्या सहकार्याने शेळी सखी बनून आपल्या कुटुंबाला मोठा आधार दिला….
इतर महिलांसोबत कुणाच्या शेतात खुरपायला जायचे. तीन वर्षांपासून ही स्थिती बदलली. माणदेशी फाउंडेशनची प्रशिक्षण देणारी बस गावात आली आणि आयुष्य बदलून गेले. इस्लामपूर येथील प्रमिला धाइंजे सांगत होत्या. माणदेशीच्या या बसमधून पार्लर किंवा शिवणकामाविषयी प्रशिक्षण दिले जात होते.
त्यावेळीही मी शेतात मजुरीलाच जायचे. “तू पाहा माणदेशीकडे जाऊन. तुला काही काम मिळेल.’असे प्रशिक्षण घेणाऱ्यांपैकी काही महिलांनी सांगितले. तिथे गेल्यावर समजले की शेळी सखी म्हणून काम करायचे आहे. घरातील लोकांनीही हे काम करावे, म्हणून सुचविले.
अखेर हे काम स्वीकारले. “माणदेशी’ने या कामासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि लागणारे साहित्य दिले आणि माझे काम सुरू झाले. सुरवातीला भीती वाटली. पण आता कामाची इतकी सवय झालीय की एक दिवसही सुटी नको वाटते, असे त्या सांगत होत्या. शेळी किंवा कोंबड्यांचे लसीकरण, त्यांच्यावर प्रथमोचार करणे आणि कृत्रिम रेतन करणे या स्वरूपाचे काम शेळी सखींच्यामार्फत केले जाते.
माळशिरस परिसरातील सुमारे 30 ते 40 गावांमध्ये जाऊन प्रमिला धाइंजे हे काम करतात. शेळीपालन आणि कुकुटपालन या व्यवसायासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना लसीकरणाचे आणि कृत्रिम रेतनाचे महत्त्व पटवून द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले. त्यांचा मोबाइल नंबर शेतकऱ्यांकडे असतो. शेळी किंवा कोंबडीसंदर्भात सल्ला घेण्यासाठी शेतकरी फोन करतात.
किंवा त्यांच्या कॉलनुसार त्याठिकाणी जाऊन शेळी किंवा कोंबडीवर प्रथमोचार करण्याचे काम त्या करतात. लसीकरणाचे काम उन्हापूर्वी करायचे असते. त्यामुळे सकाळी लवकरच त्यांचा दिवस सुरू होतो. किंवा संध्याकाळनंतर त्या कामासाठी जावे लागते. लसीकरण किंवा रेतनाबाबतचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगावे लागते. सुरवातीला भीती वाटणारे काम आता सहज होऊ लागले.
आता काम नसेल तर करमत नाही, असे त्या सांगतात. बारामती माहेर असणाऱ्या प्रमिला यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. नंतर मुक्त विद्यापीठातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. घरी पती, तीन मुली आणि एक मुलगा.
या कामासाठी सर्वांची मदत होते. विशेषतः कधी अचानक कॉल आला तर हातातील काम सोडून त्याठिकाणी जावे लागते. अशा वेळी पतींची मोठी मदत होते. मुलींनाही शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचे असल्याचे त्या सांगतात.
“माणदेशी’ संस्थांचे व्यासपीठ मिळाले म्हणून जगण्याला कलाटणी मिळाली. माणदेशीने संधी दिल्याने वेगळे आयुष्य सुरू झाले. दृष्टीकोन मिळाला. आता मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. शेळी सखी म्हणून काम करताना माझे जगणे बदलून गेले आणि माझे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेच. परंतु, आपले काम करताना इतरांनाही आर्थिक फायदा करून देता येतो, याचाही आनंद कामातून मिळतो.
“माणदेशी’ संस्था जीवनात आली. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागली. कामासाठी परिसरातील गावागावांत फिरायला लागते. गेल्या दिवाळीत स्वतःच्या पायावर स्कूटी खरेदी करता आली, केवळ “माणदेशी’नेच हे सामर्थ्य निर्माण केले, असे त्या आवर्जून सांगतात.
माणदेशी फाउंडेशनने महिलांसाठी “शेळी सखी’ हा उपक्रम सुरू केला. त्यांना प्रशिक्षण दिले. सातारा, लातूर, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यातून “शेळी सखी’ उपक्रम राबविला जातो.
भविष्यात पूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. “माणदेशी’च्या या शेळी सखी प्रकल्पास फलटणच्या निमकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे (नारी) मोठे सहकार्य लाभले आहे.
“नारी’ कडून या शेळी सखींना शेळ्यांसदर्भात पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. शेळ्यांना लागणारे ब्रीड, स्ट्रॉ वगैरे त्यांच्याकडूनच मिळते. “माणदेशी’च्या या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून “नारी’चा मोठा पाठिंबा मिळतो, असे “माणदेशी’च्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले.
या उपक्रमातून आतापर्यंत चार लाख 87 हजार शेळ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. 90 हजार शेळ्यांना प्रथमोचार देण्यात आला आहे. आणि 11 हजार कृत्रिम रेतन करण्यात आले आहे.
महिलांसाठी कार्य करणाऱ्या “माणदेशी’वर शेळीपालन उपक्रमाला महत्व देण्याचे कारण हे आहे की हा व्यवसाय प्रामुख्याने महिला करतात त्यामुळे शेळीपालन व्यवसायाद्वारे “व्यवसायाची आणि पैशाची मालकी’ दोन्ही महिलांचीच असणार, असे त्यांनी स्पष्ट केले.