अखेर तीन दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे “अन्नत्याग’ मागे
संगमनेर – शासनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे जेवन दिले जाते, तक्रार करूनही आधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार करत तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन छेडले होते. अखेर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेतली. आज सकाळी विद्यार्थ्यांनी पोहे खाऊन आपले आंदोलन मागे घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट अन्न मिळत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे शासकीय आदिवासी वसतिगृहातील सुमारे 250 मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राजूर आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी तसेच आदिवासी विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली. तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीवर विद्यार्थी आडून बसले. आंदोलनाच्या तिसच्या दिवशी या विद्यार्थ्यांनी घुलेवाडी गावातून मोर्चा काढला.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनीही विद्यार्थ्यांची समजूत काढली. मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. रात्री उशिरा पत्रकार अमोल मतकर, संजय आहिरे, पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी या आंदोलानाबाबत पुढाकार घेत थेट आदीवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तसेच माजी आमदार विवेक पंडित यांच्याशी तसेच अपर आयुक्त गिरीश सरोदे यांच्याशी अनेक वेळा विद्यार्थ्यांचा संवाद करून दिला.
मात्र तरीही विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. अखेर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सरोदे, उपायुक्त प्रदीप पोळ यांनी नाशिकवरून थेट संगमनेरला धाव घेतली. विद्यार्थ्यांचे म्हणणे पुन्हा एकदा सविस्तर ऐकून घेतले. त्यानंतर आंदोलनाची दखल घेऊन घेतलेले निर्णय व केलेली कारवाई विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्ती केली. यात समितीचे अध्यक्ष सहायक आयुक्त हितेश विसपुते, सदस्य किरण जोशी, भास्कर जेजूरकर, आर. आर. पाटील यांच्या समितीने 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही विद्यार्थी मागण्यांवर ठाम राहिले.
विद्यार्थ्यांचे समाधान होत नसल्याने अपर आयुक्त सरोदे यांनी नाशिककडे प्रयाण केले व निर्णय विद्यार्थ्यांवर सोपविला. रात्री उशिरा विद्यार्थ्यांची पुन्हा बैठक झाली व आंदोलनाचे सर्व मार्ग संपल्याने व मागण्या मान्य झाल्याने आज सकाळी या विद्यार्थ्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पो. नि. अभय परमार व पो. कॉ. बाळासाहेब यादव, पानसरे, सोनवणे, बाळासाहेब पारधी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.