मुंबई – राज्यातील पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 1284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशुधन दाखल झाले आहे. या चारा छावण्यांमध्ये पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ऍप विकसित करण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील छावण्यांमधील पशुधनाच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या राज्यातील या छावण्यांमध्ये 8 लाख 55 हजार 513 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 35 कोटी निधी उपलब्ध झाला असून चाऱ्यासाठी 25 हजार 99 क्विंटल बियाण्याचे वितरण झाले आहे. गाळपेर क्षेत्रात 17 हजार 465.64 हेक्टर तर शेतकऱ्यांच्या शेतात 41 हजार 355.68 हेक्टर अशी एकूण 58 हजार 821.32 हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची पेरणी झाली आहे. यामधून 29.4 लक्ष मेट्रिक टन हिरवी वैरण उत्पादन अपेक्षित आहे.
मदत व पुनर्वसन निधीमधून महसूल व वन विभागाकडून 10 कोटी निधी राहत व चारा शिबिरांकरिता प्राप्त झाला आहे. यामधून उस्मानाबादमधील भगवंत बहुउद्देशीय संस्था, हाडोंग्री, ता. भूम या संस्थेला 238.91 लक्ष, श्री. येडेश्वर गोकुलम गोशाळा दुधाळवाडी, येरमाळा, ता. कळंब या संस्थेला 61.09 लक्ष तर बीड जिल्ह्यातील यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पालवण, ता. बीड या संस्थेला 185.78 लक्ष निधी वितरित केला आहे.
छावण्यातील जनावरांना बारकोड
दुष्काळी भागात शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत.