नगर: महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची लंगडी सबब प्रशासकीय यंत्रणेकडून समोर केली जाते. अर्थात कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो. असे प्रकार लक्षात घेता यंदा वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी नगरविकास विभागाने महापालिकेला 31 मार्चची मुदत दिली होती. सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही महापालिका प्रशासनाने वृक्षलागवडीची पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र समोर आले आहे.
महापालिका क्षेत्राचा तब्बल चार पटीने विस्तार झाला असून, विकास कामांच्या आड येणाऱ्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा जहास होत असल्याचे चित्र आहे. त्याचे परिणाम नगरकरांना उन्हाळ्यात भोगावे लागत आहेत. उन्हाची दाहकता कमी करून पर्यावरणाला वाचविण्यासाठी केवळ वृक्ष लागवड हाच पर्याय असल्यामुळे शासनाने सन 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. वृक्षांची लागवड, संगोपन आणि देखरेख करण्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला. नेहमीप्रमाणे मे किंवा जून महिन्यांत वृक्ष लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागत असल्याची परिस्थिती होती. यामुळे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्णत्वास जात नसल्याचे चित्र समोर आले. ही बाब लक्षात घेता नगरविकास विभागाने यावर्षी 31 मार्चपूर्वी वृक्ष लागवडीसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही महापालिका प्रशासनाने वृक्ष लागवडीसाठी कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र आहे.तसेच कोणत्याही प्रकारच्या जनजागृतीला सुरुवात केली नसल्याचे दिसत आहे.
महापालिकास्तरावर वृक्ष लागवडीचे अद्याप कोणतेही नियोजन झालेले नाही. अर्थात लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबविता आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याची कल्पना असून फेब्रुवारीमध्ये खड्डे घेणे, वृक्ष लागवड करणे आदींची निविदा काढून कार्यारंभाचे आदेश देता आले असते. परंतू आता आचारसंहितेचे कारण पुढे करून पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष लागवडची लगबग करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होत आहे. यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी 25 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
यंदा 22 हजार वृक्षांचे उद्दिष्ट
यंदा नगर महापालिकेला 22 हजार 450 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील तीन वर्षांपासून महापालिकेकडून करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे प्रमाण असमाधानकारक असल्याचे चित्र आहे. उद्दिष्टपूर्ती होते पण ती नगरकरांनी लावलेल्या वृक्ष लागवडीतून महापालिका यंत्रणेकडून केवळ मोजणी होते. नागरिकांनी लावलेली झाड उद्दिष्ट्यात घेण्यात येते. त्यामुळे महापालिकेकडून होणार लाखोंचा खर्च हा कागदावर रंगविला जात आहे. दोन वर्षापूर्वी रस्त्या दुतर्फा झाडे लावण्यात आली होती. पण आज ती झाडे जागेवर नाहीत. यावर्षी 22 हजार वृक्षांचे रोपण नेमके कोणत्या ठिकाणी केले जाणार, याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे.
भौगोलिक विस्तारामुळे मनपाला वाव
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन भौगोलिक क्षेत्रात तब्बल पाच पटीने वाढ झाली आहे. नवीन भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. संबंधित जागेवर वृक्ष लागवड करण्यासाठी महापालिका प्रशासनाला मोठा वाव असल्याचे दिसून येते.