नगर – जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. अशावेळी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका व गुणपत्रिका जमा करताना बोर्डात एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हानिहाय जास्तीत जास्त संकलन केंद्र निर्माण करावेत, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांकडे त्या संदर्भात राज्याचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय शिंदे व सचिव प्रा. संतोष फाजगे यांच्या सहीने एक पत्र पाठविले असल्याची माहिती प्रा. सतीश शिर्के यांनी दिली. कोरोनाच्या व्यत्ययामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे कामकाज ठप्प असून बारावीच्या निकालास विलंब होऊ नये, म्हणून संघटनेने बोर्डाकडे विविध उपाय सुचविले असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉ. नवनाथ टकले यांनी दिली. आजही अनेक पेपर परिक्षकांकडेच आहेत. नियमकांकडे जाण्यासाठी शिक्षकांना संचार बंदीची अडचण येत आहे.
त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळावे व प्रवासादरम्यान शिक्षकांची अडवणूक होऊ नये, त्याबाबत बोर्डाने पाठपुरावा करावा. उर्वरित कामकाजासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्यनियमकांमार्फत प्रत्येक नियमकांकडून एकूण नियमन केलेल्या परिक्षकांकडून प्राप्त, नियमन केलेल्या आणि परिक्षकांकड़े जमा असलेल्या उत्तरपत्रिकांची आकडेवारी एसएमएसच्या माध्यमातून घ्यावी. ई-मेल किंवा पोस्टाच्या माध्यमातून परीक्षक व नियामक यांची गुणपत्रके बोर्डाच्या अधिकृत ई-मेल वर मागवून घेण्यात यावीत, म्हणजे शिक्षकांची गर्दी व प्रवास टाळला जाऊन कोरोनापासून सुरक्षित राहून बोर्डाचे कामकाज करता येईल. त्याबाबत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय महासंघ बोर्डाला संपूर्ण सहकार्य करणार आहे. संघटनेचे मार्गदर्शक प्रा. भास्करराव जऱ्हाड, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. अश्रुबा फुंदे, जिल्हा सेक्रेटरी प्रा. मच्छिंद्र दिघे, प्रा. सचिन वायबसे, प्रा. बाळासाहेब करंजुले आदी त्यासाठी प्रयत्नशील आहेत.