खालापूर, (वार्ताहर) – शिक्षणासमवेत व्यवहार ज्ञान असणे अतिशय महत्वाचे आहे. हे उदिष्ठे डोळ्यांसमोर ठेवून रायगड जिल्हा परिषदेच्या वडगाव शाळेने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी उपक्रम राबविला आहे.
यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा रविंद्र ठोंबरे, उपाध्यक्षा राजश्री जांभूळकर, मुख्याध्यापक सुभाष राठोड सर्व शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच गौरी गडगे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना व्यवसायिक होण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळेत शिक्षण घेत असलेले बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक वर्ग फळे – भाज्या लागवड करीत असतात. तसेच तयार झालेला माल आठवड्याच्या बाजारात किंवा बाजार पेठेत विक्री केला जात असतो. मात्र शेतीच्या या ज्ञानामध्ये भर पडावी या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी भाजी, फळे तसेच खाद्य पदार्थ यांचे दहा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच यांचे दर विद्यार्थी यावेळी खरेदीसाठी आलेल्या सर्व ग्राहक (ग्रामस्थ) यांस समजून सांगत होते. विद्यार्थी सहजपणे अर्थिक व्यवहार करीत असल्याचे पाहून उपस्थित शिक्षक, पालक यांनी मुलांचे कौतुक केले. यावेळी सोबतच ऑनलाइन व UPI चा सुद्धा व्यवहारातून प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
विद्यार्थ्यांना मिळाले बँकिंगचे ज्ञान
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातूनच, बचत, बँकिंग व्यवहार व डिजिटल पेमेंट UPI ची माहिती व्हावी व व्यावहारिक ज्ञान मिळावे हे ध्येय ठेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.