कराड, (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य नाही; परंतु नेते गेले तरी कार्यकर्ते व सामान्य जनता पक्षासोबत राहील. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. आम्ही लढू आणि जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाची भूमिका मांडली. काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात, आ. अमीन पटेल, माजी मंत्री नसीम खान उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेच्या आधी नेत्यांची बैठक झाली. या नेत्यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांशी संपर्क साधला.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली, तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बर्याच दिवसांपासून सुतोवाच होत होते. बाळासाहेब थोरात आणि इतर सहकार्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क केला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरण्याआधी विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. आम्ही ज्या विधिमंडळ सदस्यांशी आणि नेत्यांशी संपर्क साधला, त्यांच्यापैकी कुणीही भाजपमध्ये जाणार नाही.
भाजपकडून मुद्दाम वावड्या उठवल्या जात आहेत. नावे घेतली जात आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. काँग्रेस जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे. हे सगळे कशामुळे घडतेय, ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. भाजपकडे आज निवडणुकीला सामोरे जायचे धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचे विभाजन करून, आपल्याला काही संधी मिळते का, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
आमची नेतेमंडळी भाजपमध्ये गेली, तरी त्यांना मते देणारे नेते, कार्यकर्ते आणि जनता त्या नेत्यांबरोबर जाणार नाही. ते निवडणुकीला सामोरे जातील, तेव्हा त्यांचे खरे चित्र दिसेल. आम्ही आणि आमचे सर्व सहकारी खंबीरपणे उभे आहोत. अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असून, त्याबद्दल खंत आहे. ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्यावर कसला दबाव होता, कशाची भीती होती, याबाबत तेच सांगू शकतील; परंतु राजकीय आव्हानांना काँग्रेस मजबुतीने सामोरी जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.