कुरकुंभमधील मुकादमवाडीतील स्थिती : केमिकलयुक्त पाणी असल्याचा नागरिकांच दावा
कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांनी आपले रसायन मिश्रित केमिकल युक्त निळसर पाणी थेट उघड्यावर सोडले आहे. या पाण्यावर निळसर तेलकट असा थर आलेला आहे. हे केमिकल युक्त निळसर पाणी मुकादमवाडी जवळ थेट सेवा रस्त्यावर वाहताना दिसत आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल धरावा लागत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कुरकुंभ हे गाव प्रदूषणासाठी बहुचर्चित असताना यात एमआयडीसी स्थापने पासून आतापर्यंत या प्रदूषणाला कसलाच आळा बसला नाही.पाऊस सुरू झाला की बहुतांश कंपन्या आपले सांडपाणी असे उघड्यावर सोडतात. त्यामुळे पाऊस होऊन दोन दिवस झाले नाही तोवर असे निळसर केमिकल युक्त पाणी सेवा रस्त्यावरून वाहताना दिसत आहे, अशा या घातक प्रकारामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गालगत कुरकुंभ परिसरात 1993 मध्ये एमआयडीसी स्थापनेसाठी कुरकुंभ, पांढरेवाडी या दोन गावातील जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. कुरकुंभ एमआयडीसी हे केमिकल झोन म्हणून ओळखले जाते. एमआयडीसी स्थापनेपासून ते आतापर्यंत या प्रदूषणाला कसलाच आळा बसला नाही. दिवसा ढवळ्या असे केमिकल युक्त पाणी उघड्यावर वाहत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कंपन्यांचे केमिकल युक्त पाणी दिवसा ढवळ्या सेवा रस्त्यावरून वाहत आहे मात्र या महामार्गावरील देखभाल-दुरुस्ती अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
- आम्हाला औद्योगिक वसाहती मधील काही कंपन्यांचा जलप्रदूषण, वायुप्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. येणाऱ्या काळात आम्ही प्रदूषण करणाऱ्या काही कंपन्या तीन महिन्यांच्या आत बंद करणार आहोत. जर प्रदूषण करणाऱ्या काही कंपन्या बंद झाल्या नाही, तर त्या कंपन्याच्या समोर मोठ्या प्रकारचे जनआंदोलन उभे केले जाईल.
– उमेश सोनवणे, ग्रामपंचायत सस्य, कुरकुंभ