सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) –
खटाव तालुक्याच्या राजकारणातील मायणीतील गुदगे आणि निमसोडच्या मोरे या हेवीवेट घराण्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, या वादावर पडदा टाकून “आमचं ठरलंय’ असे म्हणत सुरेंद्र गुदगे आणि नंदकुमार मोरे यांच्यात साताऱ्यातील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये हास्यविनोद रंगले होते. ते एकमेकांना टाळ्या देत असल्याने या दोन “दादां’च्या मनात चाललंय तरी काय, हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, त्यांच्यातील समीकरणामुळे “आमचं ठरलंय’ टीममधील नेत्यांच्या पोटात गोळा येऊ नये, म्हणजे झालं.
खटाव तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार स्व. भाऊसाहेब गुदगे यांचा एकहाती अंमल होता. त्यावेळी भाऊसाहेबांनी निमसोडच्या महादेवआप्पा मोरेंना पंचायत समितीत निवडून आणून सभापतिपदाच्या खुर्चीत बसवले होते.
भाऊसाहेब अन् आप्पांची जशी मैत्री होती, तशीच ती सुरेंद्र गुदगे आणि नंदकुमार मोरे यांची होती. राजकारण, व्यापार, व्यवहार अशी सर्वांगांनी असलेली या मैत्रीचे रूपांतर बदलत्या राजकारणात दुष्मनीत झाले होते. 2009 साली आपण मायणीत शरद पवारांची घेतलेली सभा, सुरेंद्र गुदगेंनी हायजॅक केल्याचा आरोप नंदकुमार मोरे यांनी केला होता.
त्यावेळी मोरेंनी गुदगेंना अनेक दुषणे दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होत होते. मात्र, गुदगे-मोरे यांचे वैर बदलत्या राजकीय समीकरणांमुळे मिटल्याचे सोमवारी दिसून आले.
माण मतदारसंघात “आमचं ठरलंय’ टीमने अनिल देसाईंच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केल्यानंतर हॉटेलच्या एका कोपऱ्यात सुरेंद्र गुदगे आणि नंदकुमार मोरे यांनी बराच वेळ गुफ्तगू केले. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटत होते. एकमेकांना बघून घेण्याची भाषा करणारे हेच दोघे जण आज एकमेकांना टाळ्या देत होते. याचीच चर्चा सुरू होती.