दत्तात्रय आंबुलकर
सफरचंद म्हटले की, आपल्याला आठवते ती काश्मीरपासून हिमाचल-उत्तराखंडपर्यंत पसरलेली व बहरलेली सफरचंदाची लागवड. या सफरचंदांना देश-विदेशातून मोठी मागणी असते. प्रामुख्याने उत्तर भारतात परंपरागत स्वरूपात केली जाणारी सफरचंदाची शेती दक्षिण भारतातील तेलंगणामधील दोन शेतकऱ्यांनी यशस्वीपणे कशी केली त्याचीच ही प्रेरणादायी कथा.
याकामी पुढाकार घेतला तेलंगणाच्या निझामाबाद येथील लिंबा रेड्डी व के. बालाजी या शेतकरी जोडगोळीने. लिंबा रेड्डी यांनी आपल्या पाच एकर शेतीचा अभ्यास करून त्यात सफरचंद लावण्याचा धाडसी निर्णय घेतला.
याकामी त्यांना के. बालाजी यांची साथ लाभली. भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणाऱ्या लिंबा यांनी यूट्युबच्या माध्यमातून आधुनिक शेतीविषयी माहिती मिळवली. यातूनच त्यांना हिमाचल प्रदेशच्या एच. शर्मा या सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचा पत्ता लागला. लिंबा यांनी त्यांच्याकडून सफरचंदाविषयी सर्व तपशील जाणून घेतला. यातून तेलंगणासारख्या उष्ण प्रदेशात लागवड करण्यासारखी सफरचंदाची जात आढळून आली. नंतर त्यांनी शेतात सफरचंदाची लागवड करण्याचे ठरविले.
लिंबा यांनी शर्मा यांच्याकडे 500 रोपट्यांची मागणी केली. अशा सफरचंदाची लागवड निझामाबाद जिल्ह्यातील आपल्या शेतीत लिंबा व बालाजी यांनी अभ्यासपूर्ण प्रयत्नाने केली. रोपट्याची निगा राखली गेली. सुमारे दीड वर्षानंतर या प्रयोगशील शेती प्रयत्नांचे फळ त्यांना लाभले. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या शेतात सफरचंद बहरली.
सुरुवातीला त्यांच्या फळबागेकडे उत्सुकतेने पाहणारे स्थानिक फळव्यापारी बागेतील सफरचंद तयार झाल्याचे कळताच लिंबा यांच्या शेतात येऊन सफरचंदाची मागणी करू लागले. सफरचंदाचा दर्जा पाहता व वाहतुकीचा खर्च नसल्याने अधिक पैसे देऊ लागले. आता सफरचंदाचे हे वाण दक्षिणेत पसरले आहे. अशा प्रकारे तेलंगणात हिमाचल प्रदेशाच्या सफरचंदाची शेती यशस्वी ठरली.