– हेमंत देसाई
2023-24 मध्ये जगातील प्रत्येक सात आयफोनपैकी एक भारतात बनवण्यात आला. येत्या दोन ते तीन वर्षांत भारतात पाच लाखांहून अधिक आयफोन्स दरवर्षी तयार करण्याची योजना अॅपलनेच आखली आहे.
जगद्विख्यात ‘टेस्ला’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी अचानकपणे भारताचा दौरा रद्द केला असून, नजीकच्या भविष्यकाळात भारतास भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे; परंतु टेस्लाच्या कारखान्यांमधील उत्पादन कमी झाले असून, मागणीच्या अभावामुळे कार्सचे साठे पडून आहेत. मात्र, भारताला तोंडदेखले आश्वासन दिल्यानंतर, मस्क यांनी चीनचा मात्र दौरा केला आहे. टेस्लाचे फुल सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर आणि डेटाचे हस्तांतरण करण्याबद्दल त्यांनी चीनच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
गेल्या महिन्यात भारताने आपले इलेक्ट्रिक वाहनविषयक धोरण घोषित करून, टेस्लाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला; परंतु टेस्लाचा सर्वात मोठा प्लँट हा शांघायला असून, तेथे दरवर्षी मॉडेल ‘थ्री’ आणि मॉडेल ‘वाय’ या दहा लाख कार्सचे उत्पादन होते. चीनमध्ये या कार्सचे उत्पादन केले जाते आणि तेथून त्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व युरोपात धाडल्या जातात. टेस्लाने आतापर्यंत चीनच्या बाजारपेठेतही 17 लाख कार्स विकल्या आहेत.
चीनच्या आर्थिक प्रगतीच्या तुलनेत भारत अद्याप खूपच मागे आहे; परंतु परदेशी कंपन्यांनी आपली उत्पादने भारतात तयार करावीत आणि येथून ती जगभर पाठवावीत, यासाठीच केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ हे धोरण आणले आहे. तसेच ‘आत्मनिर्भर भारताची’ ही घोषणा देऊन त्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात आपण महत्त्वाचे खेळाडू बनावे, या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे.
जगद्विख्यात अॅपल ही कंपनी आजवर मुख्यत्वेकरून चीनमध्ये आयफोनचे उत्पादन करत होती; परंतु आता या कंपनीने आपले जुळणीचे काम मोठ्या प्रमाणात भारताकडे वळवले आहे. 2023-24 मध्ये भारताने एकूण 15 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याच्या स्मार्टफोन्सची निर्यात केली. त्यामध्ये 65 टक्के प्रमाण हे आयफोन्सचे होते. 2022-23 मध्ये आपण पाच अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन्स अन्य देशांत धाडले होते. ते प्रमाण 23-24 मध्ये दहा अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचले.
तैवानमधील ‘फॉक्सकॉन’ ही कंपनी म्हणजे जगातील इलेक्ट्रॉनिक्स काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमधली सर्वात मोठी कंपनी. तीदेखील आपल्या आयफोन्सची भारतात जुळणी करते. टाटा इलेक्ट्रॉनिक्सलाही प्रथमच आयफोन्सच्या जुळणीचे काम मिळाले आहे. भारतातील अॅपलच्या कारखान्यात दीड लाख लोक काम करतात आणि हा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढत जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
अॅपलमध्ये महिलांनाही चांगल्यापैकी रोजगार मिळाला आहे. अॅपलला वेगवेगळ्या वस्तू व घटकांचा पुरवठा करणार्या उद्योगांमधून आणखी पाच लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. अॅपलचा विस्तार होत असून, परदेशातील या कंपनीच्या घटक पुरवठादारांनीही भारतात आपले प्लँट स्थापन करण्याचे ठरवले आहे. कॅमेरा मॉड्यूल्स, कम्युनिकेशन्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग वगैरेंच्या उत्पादनासाठी हे पुरवठादार भारताचा विचार करत आहेत. अॅपलचा भारतातील कारखाना तामिळनाडूतील श्रीपेरमबुदूर येथे आहे. हे ठिकाण चेन्नईपासून 40 किलोमीटरवर आहे. तेथे ‘फॉक्सकॉन’चे देखील आयफोन जुळणीचे दोन कारखाने आहेत.
2023-24 मध्ये जगातील प्रत्येक सात आयफोनपैकी एक आयफोन भारतात बनवण्यात आला होता. 2028 पर्यंत जगातील 25 टक्के आयफोन भारतात तयार होतील, असे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत भारतात पाच लाखांहून अधिक आयफोन्स दरवर्षी तयार करण्याची योजना अॅपलनेच आखली आहे. तसेच एअरपॉड वगैरे अॅक्सेसरीजचे उत्पादनही येथेच करण्यात येणार आहे; परंतु चीनमधील आयफोन युनिट्सची कार्यक्षमता भारतापेक्षा अधिक आहे. तसेच आयफोन्ससाठी जे सुटे भाग आयात करावे लागतात, त्यावरील कर आपल्याकडे जास्त आहेत.
चीनमध्ये कंत्राटी पद्धतीने अॅपलसाठी उत्पादन करणार्या ठेकेदार-कंपन्यांची संख्या 2023 मध्ये 151 वरून 157 वर गेली. उलट भारतातील ही संख्या फक्त 14 इतकीच स्थिर राहिलेली आहे. मात्र अमेरिका व चीन यांचे संबंध बिघडल्यामुळे, तसेच 2019-20 मधील चीनमधल्या कोविडविषयक निर्बंधांमुळे अॅपलने उत्पादनातला मोठा भाग भारताकडे वळवला. शिवाय भारत सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना लागू केल्याचाही फायदा झाला. फॉक्सकॉनच्या तामिळनाडूतील कारखान्यात 40 हजार कर्मचारी काम करतात. तर याच क्षेत्रातील ‘पेगाट्रोन’मध्ये दहा हजार आणि टाटाने अलीकडेच ताबा घेतलेल्या ‘विनस्ट्रॉन’च्या प्रकल्पात 27 हजार कर्मचारी आहेत.
अॅपलच्या यशामुळे प्रेरित होऊन, गूगलनेही भारतात फोनसाठी असेंब्लिंग सुरू केले आहे. तसेच टाटा इलेक्ट्रॉनिक्स, डिक्सन, डब्ल्यूडीएन आणि केन्स या कंपन्यांनी परदेशातील स्मार्टफोन कंपन्यांसाठी जुळणीचे काम जोरदारपणे हाती घेतले आहे. स्मार्टफोन्ससाठी घटकांची निर्मिती करणार्या अनेक कंपन्या भारतात यशस्वीपणे काम करत आहेत. ‘जबील’ ही पुण्यातील कंपनी एअरपॉड्ससाठी प्लॅस्टिक केसिंग्ज आणि एन्क्लोजर्स बनवते. येथूनही उत्पादने व्हिएतनाम व चीनला धाडली जातात आणि तेथे त्यांची जुळणी होते. भारतात रोजगाराचा प्रश्न ‘आ’ वासून उभा असून, त्यामुळे स्मार्टफोन व आयफोन ही क्षेत्रे बहरणे, हे भारताच्या दृष्टीने भल्याचेच आहे.