– यशेंद्र क्षीरसागर
आज 30 एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. 18व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुकडोजींचे निवडणूकविषयक विचार…
मतदानाचे महत्त्व, मताचे महत्त्व, निवडणुकीचे राष्ट्रीय जीवनातील स्थान याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुमारे 70 वर्षांपूर्वी 1955 मध्ये आपल्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून सुंदर भाष्य केले आहे. ‘ग्रामगीता’ या ग्रंथामध्ये जे 41 अध्याय आहेत त्यामध्ये जीवन, शिक्षण, ग्रामशुद्धी असे अनेक अध्याय महत्त्वाचे आहेत. या ग्रामगीतेमध्ये निवडणूक, मतदानाचे महत्त्व, मताचे महत्त्व, सेवकाचे महत्त्व, सेवक कसा ओळखावा, मत कशा प्रकारच्या व्यक्तीला द्यावे असे विचारमंथन तुकडोजींनी आपल्या अभंगातून केले आहे-
मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक! निवडणूक ही संधी अचूक, भवितव्याची!
अत्यंत अचूक आणि सोप्या शब्दांत प्रभावीपणे तुकडोजींनी मतदान निवडणुकीचे स्वरूप विशद केले आहे. शंभर टक्के मतदान करणे हे आज आपले ध्येय आहे. मतदान हा खूप मोठा अधिकार आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 2 वर्षे 11 महिने 17 दिवस राबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली.
समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण प्रेम इत्यादी अनेक मूल्यांचा जागर त्यांनी राज्यघटनेमध्ये केला आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये म्हणजेच राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये; जिला घटनेची गुरूकिल्ली म्हणतात त्यामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असे मूल्यांचे वर्णन केले आहे. बाबासाहेबांनीसुद्धा सांगितले आहे की मतदान हा आपला अधिकार आहे. त्यासोबत ते राष्ट्रीय कर्तव्यदेखील आहे. या पार्श्वभूमीवर तुकडोजींचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
तुकडोजींनी मतदानाला करमणूक समजलेले नाही. समाजामध्ये आज मतदान आणि निवडणुकीला करमणुकीचे बाजारू स्वरूप आले आहे. हे स्वरूप तुकडोजींना मान्य नाही. म्हणून समता, बंधुता, समाजाचा विकास आणि समृद्धी साधावयाची असेल तर मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
निवडणूक हा बाजार नाही. निवडणूक अचूक भवितव्याची संधी आहे. कारण निवडणुकीतूनच आपण योग्य नेता निवडू शकतो. जो आपल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने झटू शकतो. मतदानाच्या अधिकाराकडे हलक्या पद्धतीने पाहू नये, असे तुकडोजी निक्षून सांगतात. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. आपण जर मत दिले तर समृद्धी, विकास आणि संस्कृतीचे संवर्धन होईल, असे तुकडोजींना सुचवायचे आहे.
म्हणूनच निवडणुकीला बाजार न समजता ते पवित्र कार्य समजावे. राष्ट्राच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या बांधणीसाठी मतदान महत्त्वाचे असून निवडणूक हा लोकशाहीचा महत्त्वाचा उत्सव आहे. इतकेच नव्हे तर आपले आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याची ती एक नांदी आहे असे तुकडोजी सुचवू पाहतात. त्याच बरोबर तुकडोजी दुसर्या अभंगात म्हणतात-
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे,
आपुल्या मतावरील साचे!
एकेक मत लाखमोलाचे,
ओळखावे याचे महिमान!
ग्रामगीतेमधील संघटनशक्ती या अध्यायात तुकडोजी महाराजांनी निवडणूक, मतदानाचे महत्त्व, खरा पुढारी कसा असावा, मतदान कुणाला करावे, मतदान कोणते गुण बघून करावे, सेवा किती महत्त्वाची आहे, सेवेकरीलाच निवडून द्यावे असे अनेक विचार व्यक्त केले आहेत. अनेकांना असे वाटते की आपल्या मताची किंमत काय आहे. माझ्या एका मताला काय किंमत आहे. माझे एका मताने काय फरक पडणार आहे? हा गैरसमज खोडून काढताना महाराज म्हणतात आपल्या एका मतामुळे गावाचे किंवा राष्ट्राचे भवितव्य निर्माण होणार आहे. असे एक एक मत मिळूनच मतगंगा तयार होणार आहे आणि राष्ट्राचे भवितव्य सर्व मतांचा परिपाक असणार आहे.
प्रत्येक मत लाखमोलाचे आहे. त्याचा स्वतंत्र विचार करू नये. एकत्रित विचार करता एक एका मताला किती किंमत आहे हे समजून येईल. एकंदरीतच माझ्या मताने काय बिघडते असा विचार करून सध्या काळात केवळ 55-60 टक्के मतदान होते हे अत्यंत चुकीचे आहे. काही ठिकाणी तर काही मतदान केंद्रांवर तर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते.
अशा केंद्रांवर विशेष मतदान जागृती घ्यावी लागते. महाराज म्हणतात, त्याप्रमाणे जात-पात, गरीब-श्रीमंत, असा कोणताही भेदभाव न बाळगता सेवेकरी बघून मत द्यावे. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. विशेषतः सुशिक्षित व्यक्तींमधून मतदानाचे औदासीन्य दिसून येते. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेणे आणि मतदानाला न जाणे हा राष्ट्रद्रोह अनेकांकडून घडतो.
महाराज एका अभंगात म्हणतात-
ऐसे न करावे वर्तन,
असतील जे इनामदार सेवकजन
तेची द्यावेत निवडून,
एकमते सर्वांनी!
केवळ मतदानाचे महत्त्व, निवडणुकीचे महत्त्व सांगून तुकडोजी महाराज थांबत नाहीत, तर ज्याला मत द्यावयाचे त्याच्या गुणांचे वर्णन करतात. जे इनामदार आहेत, जे प्रामाणिक आहेत आणि जे सेवकजन आहेत, त्यांनाच निवडून द्यावे आणि त्यांना सर्वांनी एकमताने निवडून द्यावे असा आग्रह आपल्या अभंगातून करतात.
निवडणूक जणू स्वयंवर,
ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर! त्यासि लावावी कसोटी सुंदर,
सावधपणे!
स्वयंवर करीत असताना, लग्न करीत असताना आपण आपला साथीदार शक्य तेवढ्या सावधपणे निवडतो. कारण संपूर्ण जीवन त्याच्यासोबत काढायचे असते. सुख-दुःख वाटून घ्यावयाचे असतात. नेमके असेच निवडणुकीबाबत आहे. निवडणुकीच्या बाबतीतसुद्धा पूर्णतः कसोटी लावाव्यात. त्या कसोटी सुंदर म्हणजेच चारी बाजूंनी विचार करून निवडलेल्या असाव्यात आणि सावधपणे निवडणुकीला सामोरे जावे. अन्यथा दुर्जन शिरजोर होतील अशी अभंगात तुकडोजी महाराज भीती व्यक्त करतात. आपल्या मतांचा एकदा त्यांना आधार मिळाला की सगळ्यांना ते त्रास देतात आणि अशाप्रकारे हे मतदान सत्पात्री होत नाही. म्हणून मतदान सत्पात्री असावे असे आवर्जून तुकडोजी सांगतात.
मत हे दुधारी तलवार,
उपयोग न केला बरोबर!
तरी आपलाचि उलटतो वार, आपणावर शेवटी!
मतदान केलेच पाहिजे. देशाच्या विकासात सहभागी झाले पाहिजे. हा देश आपला आहे. त्यामुळे मतदान आणि निवडणुकीच्या बाबतीत तुटक राहू नये. मत ही दुधारी तलवार आहे, असे ते निक्षून सांगतात. जर त्याचा उपयोग बरोबर केला नाही तर आपल्यावरच वार उलटतो. महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ही भवितव्याची अचूक संधी आहे, अशा उपदेशातून तुकडोजी महाराज आपल्याला निवडणुकीचे पावित्र्य दाखवून देतात. ते खरंच अनमोल आणि दीपस्तंभाप्रमाणे आहे.