सातारा – बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी स्वागत कमान अज्ञातांकडून पाडण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने शुक्रवारी वाढे फाटा येथे उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी केले.
या मोर्चामुळे सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. बेडग येथील घटनेचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे पडसाद उमटले आहेत. या गावातील आंबेडकरप्रेमी अनुयायांनी आपली घरे बंद करून बेडग ते मुंबई असा लॉंग मार्च आयोजित केला आहे. हा लॉंग मार्च गुरुवारी रात्री कराडवरून साताऱ्यात दाखल झाला.
शुक्रवारी सकाळी अशोकबापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीनशे आंदोलक चालत पुण्याच्या दिशेने निघाले. वाढे फाटा येथील उड्डाण पुलावर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्य. कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला. या आंदोलनामध्ये
संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश गाडे इत्यादी उपस्थित होते. हा साखळी मोर्चा पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्हा मार्गे मंत्रालयाकडे रवाना होणार आहे. सातारा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मोठी परंपरा आहे. येथील आंदोलन सनदशीर मार्गाने आणि शांततामय पद्धतीने करण्याचे आवाहन अशोकबापू गायकवाड यांनी केले. आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.
साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक अजित कोकाटे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, धनंजय फडतरे तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. महामार्गावरील वाहतूक या काळामध्ये सेवा रस्त्याने वळवण्यात आली होती. अर्ध्या तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आंदोलक पुण्याच्या दिशेने रवाना झाले.