नवी दिल्ली – मोदी सरकारने लष्करात कंत्राटीपद्धतीने चार वर्षांसाठी जवानांची भरती करण्याची जी योजना सुरू केली आहे त्यावरून देशातील बेरोजगार युवकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या कंत्राटी पद्धतीच्या जवान भरतीला विरोध करण्यासाठी आज बिहार आणि उत्तरप्रदेश मध्ये शेकडो युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दगडफेक केली. अनेक ठिकाणी रेल्वे व रस्त्यावरील वाहतूकही अडवण्यात आली होती.
सैन्य दलांचा खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारने ही अग्निपथ नावाची योजना आणली आहे. त्यात युवकांना चार वर्षासाठी लष्करात भरती केले जाईल आणि त्यातील 75 टक्के युवकांना नंतर काढून टाकले जाणार असून त्यातील केवळ 25 टक्के युवकांचाच पुढील नियमीत लष्करी सेवेसाठी विचार केला जाणार आहे.
देशातील युवकांना ही योजना मान्य नाही. त्यामुळे युवक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज पहायला मिळाले. बिहारच्या बक्सर मध्ये रेल्वेवर दगडफेक करण्यात आली, मुज्जफरपूर मध्ये रस्त्यावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न झाला.
बक्सर मध्ये आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवला. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसला तासभर विलंब झाला. सरकारने लष्करात पेन्शन आणि वेतनावर होणारा खर्च टाळण्यासाठी ही नवीन कंत्राटीपद्धतीने भरतीची योजना आणली आहे.