नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सगळ्याच विषयांवर सविस्तर उत्तरे दिली आहेत. माझ्याकडे नव्या योजना आहेत, कोणी घाबरण्याचे कारण नाही असे नमूद करतानाच आपले निर्णय हे कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत तर देशाच्या समग्र विकासासाठी असल्याची टिप्पणी त्यांनी केली. तसेच सध्या कायम वादात असलेली ईडी चांगली काम करत असल्याची प्रशंसाही त्यांनी केली.
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर ते म्हणाले की आम्ही याविषयी कटिबध्द आहोत. अनेक लोकांनी समितीला सूचना केल्या आहेत. खूप सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण शिफारसी आल्या आहेत. जर आम्ही समितीच्या शिफारसी लागू करू शकलो तर त्यातून देशाचा फायदाच होणार आहे.
राम मंदिराच्या विषयावर ते म्हणाले की कॉंग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने या मुद्द्याचा राजकीय शस्त्रासारखा वापर केला. जेंव्हा माझा किंवा माझ्या पक्षाचाही जन्म झाला नव्हता त्याचवेळी हे प्रकरण न्यायालयात मिटवता आले असते. अडचणीवर काही तोडगा काढता आला असता. ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी ते ठरवू शकत होते की असे असे केले जाईल.
मात्र केले नाही. का? ते त्यांच्या मतपेढीच्या राजकारणाचे शस्त्र होते व त्याचा त्यांनी वापर केला. तामिळनाडूतील द्रमुक हा पक्ष सनातन धर्माच्या संदर्भात जी विधाने करत आहे त्यावर मोदी म्हणाले की याबाबत कॉंग्रेसला विचारले पाहिजे. इतके विष ओकणाऱ्यांसोबत बसण्यामागे त्यांची काय अगतिकता आहे?
इलेक्टोरल बॉंड
इलेक्टोरल बॉंडस् अर्थात निवडणूक रोख्यांच्या संदर्भात बोलताना मोदी यांनी असा दावा केला की या विषयावर विरोधी पक्ष खोटी माहिती पसरवत आहेत. निवडणुकीतील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी ही योजना होती आणि विरोधी आरोप करून पळ काढू पाहत आहेत. कोणत्या कंपनीने पैसे दिले, कोणाला दिले, कुठे दिले याची उत्तरे बॉंडस्मुळे मिळू शकत आहेत. त्यामुळे जेंव्हा विरोधी पक्ष याचा प्रामाणिकपणे विचार करतील तेंव्हा नंतर सगळ्यांनाच याचा पश्चाताप होईल.
माहिती सार्वजनिक झाल्यावरून ते गोंधळ घालत आहेत. त्यांनी देशाला पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलले आहे. २०१४ च्या अगोदरही निवडणुकीत पैसा खर्च होत होता. मात्र कोणता पैसा कुठून आला आणि कोणी खर्च केला याची माहिती मिळत नव्हती. कोणतीही यंत्रणा परिपूर्ण नसते. त्रुटी असतील तर दुरूस्ती केली जाऊ शकते.
संविधान बदलणार का?
याबाबत बोलताना ते म्हणाले की विरोधी पक्षांची अडचण आहे की ते पूर्ण देशाला एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही विविधतेची पूजा करतो आणि त्याचा उत्सव साजरा करतो. ज्या व्यक्तीने सगळ्यांत प्राचीन भाषेचा म्हणजे तमिळ भाषेचा संयुक्त राष्ट्रात उत्सव साजरा केला त्या व्यक्तीवर कॉंग्रेस कशाचा आधारावर आरोप करते आहे ते मला कळत नाही. मी वेगवेगळ्या राज्यांची वेषभूषा केली तरी त्यांना अडचण होते. त्यांना सगळे एकाच साच्यात बसवायचे आहे ही त्यांची अडचण आहे.
आम्ही विविधतेची पूजा करतो. कोणी आपल्या मातृभाषेचा उपयोग करून डॉक्टर किंवा इंजिनिअर का होऊ शकत नाही? मी जेंव्हा मातृभाषेबद्दल बोलतो याचा अर्थ तिची महानता अधोरेखित करतो आहे. वैविध्यता आणायचा मी प्रयत्न करतो आहे. तरीही त्यांना आरोपच करायचे असतील तर मी काय करू शकतो?
ईडीबाबत काय म्हणाले?
ईडीच्या तपासाच्या प्रकरणांमध्ये केवळ ३ टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. ९७ टक्के प्रकरणे त्या लोकांशी संबंधित आहेत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. २०१४ च्या अगोदर ईडीने केवळ पाच हजार कोटींची संपत्ती जप्त केली. मात्र माझ्या कार्यकाळात १ लाख कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. हा देशातील लोकांचा पैसा नाही का, असा सवाल त्यांनी केला.