पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच बाजार घटकच शेतीमाल चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वारणारांनीच शेतीमालाची चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मार्केट यार्डात खळबळ उडाली आहे. फळे-
भाजीपाला विभागातील शेतमालाच्या चोऱ्या काही केल्याने कमी होत नाहीत. चोऱ्यांमुळे शेतकरी, आडते वैतागले गेले आहेत. त्यात आता बाजार घटकही चोरी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आडत्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मार्केट यार्डातील तरकारी विभागातील जाधव जगताप कंपनी गाळा नंबर ३३७ येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कांदा विभागामध्ये काम करणाऱ्या दोघांनी गाळ्यावरून फळभाज्या झोळीत भरून नेल्या आहेत. शेतकरी शेतमाल वजन करून पाठवतात. शेतकऱ्यांना वजनाप्रमाणे पट्ट्या करून पैसे द्यावे लागतात.
मात्र, अशा प्रकारच्या चोऱ्यांच्या घटना वारंवार होत आहेत. रोज वजन कमी लागत आहे. आम्ही आडते सगळे पैसे टाकून पट्ट्या करून देत आहोत. असे प्रकार मार्केटला किती दिवस चालणार आहेत. याच्यावर काहीतरी तोडगा काढावा, असे संबंधित आडत्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, पूर्वीही व्यापाऱ्यांच्या व्हॉट्सग्रुपवर शेतमालाच्या चोरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अद्याप या प्रकाराची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. चोऱ्यांमुळे बाजार घटक हैराण झाले असून, शेतकरी, आडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
ही घटना गंभीर आहे. संबंधित दोघांची माहिती घेऊन परवाना रद्द करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.
शेतकऱ्यांचा माल चोरणारा कोणीही असेना, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशा चोरट्यांना माफी अथवा सवलत देऊ नये.
– विलास भुजबळ, ज्येष्ठ आडतदार, मार्केट यार्ड