पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुका जवळपास दीड महिन्यांनी असल्या, तरी शहरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. पुण्यासाठी ही निवडणूक होणार असली, तरी वातावरण मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात तापण्यास सुरूवात झाली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार आमदार रवींद्र धंगेकर आणि काॅंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे. त्यात प्रामुख्याने भाजपवर आरोप करण्यात आले आहे. मात्र, या आरोपांना भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी उत्तर दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे चित्र आहे.
आमदार धंगेकर म्हणाले…
पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असून, याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. १९) भेट घेत संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी “भाजपकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत आहे.
आचारसंहिता लागू असताना शहरातील गल्लीबोळातील भिंतीवर कमळाचे चित्र भाजप रंगवत आहे. आजही हे विद्रुपीकरण सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार पहायला मिळत आहेत. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणुका लढवण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे,’अशी टीका यावेळी धंगेकर आणि जोशी यांनी केली.
हेमंत रासने म्हणाले…
भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी धंगेकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. धंगेकर यांनी जिथे कामे केली नाहीत, तिथेही स्वत:चे फलक लावले आहेत. हे अद्यापही तसेच आहेत. त्यामुळे प्रसिद्धीसाठी ते भाजपवर आरोप आहेत. तर, मतदारसंघात कामे होत नाहीत, म्हणून मनपा आयुक्तांकडे जाणाऱ्या धंगेकरांनी कसबा विधानसभा मतदारसंघात जागोजागी आपल्या प्रयत्नातून काम झाल्याचे फलक लावले आहेत. ते सर्व राजकीय आणि अनधिकृतही आहेत.त्यामुळे आधी त्यांच्यावरच आचारसंहिता भंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी रासने यांनी केली आहे.