नगर, (प्रतिनिधी) – थकीत कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 31 मार्च अंतिम टप्प्यात थकीत करावरील शास्तीत (दंड) 75 टक्के माफी जाहीर केली आहे. मालमत्ताधारकांना 16 ते 31 मार्चपर्यंत शास्ती माफीचा लाभ घेता येणार आहे. 31 मार्चनंतर मात्र, थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
या शास्ती माफीचा लाभ घेत 3 दिवसात 1 कोटी 1 लाख रुपयांची थकबाकी मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे. थकबाकी वसुलीसाठी मनपाने 14 फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती आणि नळ बंद करण्याची मोहीम सुरू केली होती. गेल्या महिनाभरात वसुली कर्मचार्यांनी 1059 मालमत्ताधारकांवर कारवाई केली. मात्र, वसुली कशीबशी तीन कोटी झाली.
थकबाकीच्या तुलनेत ही वसुली नगण्य आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. देणेदारांची देणे देण्यासाठी मनपाकडे सध्या पैसे नाहीत. पाणीपट्टी व महावितरण बिल देणं महापालिकेला आहे. एकमेव मार्ग असल्याने आयुक्तांनी 75 टक्के शास्ती माफी देऊन करदात्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. आता शास्ती माफीनंतर किती थकबाकीदार कर भरतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जप्तीपूर्व नोटीस – 5094
नळ कनेक्शन बंद – 1010
एकूण कारवाईची संख्या – 1059
वॉरंट बजावले – 254
प्रतिष्ठित भरणार का कर ?
वसुलीसाठी महिनाभरात मनपाने केलेली कारवाई मालमत्ता जप्ती 59 शहरातील सर्वसामान्य नागरिक नियमित कर भरतात. ज्यांचा कर थकतो ते कारवाईच्या भीतीने दंड भरून का होईना पण कर भरतात. शहरात सर्वाधिक थकबाकी ही हॉटेलचालक, मंगल कार्यालये, मोठमोठे दुकानदार, भूखंडधारक, मोबाईल टॉवर कंपन्या, आदी मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. आता शास्ती माफीनंतर हे धनदांडगे कर भरणार का? असा प्रश्न आहे.