मुंबई – भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात दिसून येत आहे. रात्री 12 वाजेपासून फटाक्यांच्या आतषबाजीने जयंतीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपासूनच डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला होता.
राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत शुक्रवारी सायंकाळी मिरवणुका निघाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना डॉ.आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
राज्यभरात शुक्रवारी, रॅली काढून, तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मुंबई महापालिकेने यंदा चैत्यभूमीवर जोरदार तयारी केली होती. लाखोंचा लोटणारा जनसागर पाहून यावेळी नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
राज्यभरात विविध कार्यक्रम
आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या जवळपास 100 दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले. स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या 10 हजार 132 फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली. मनमाडमध्ये रात्री 12 वाजता भीम अनुयायांनी ढोल ताशांच्या गजरात मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.