मुंबई – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला होता. लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 8 वर्षाच्या चिमूरड्याचा मृत्यू झाला आहे. या बसमधील सर्व सर्वजण बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे सदस्य होते.
मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील हे सदस्य होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील पिंपळे गुरव, सुदर्शन नगर येथे ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. वादन संपल्यानंतर ते रात्री उशिरा मुंबईकडे निघाले होते. मात्र अपघातात 8 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला.
वीर कमलेश मांडवकर असे या मुलाचे नाव होते. तो एकुलता एक होता. खडकपाडा परिसरातीलच महापालिका वसाहतीत राहणारा वीर कमलेश मांडवकर आठवीत शिकत होता. या मुलाचा शेवटचे वादन करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहे.
दरम्यान, या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या आणि जखमींना शासकीय खर्चातून वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही दिले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या अपघतातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.