मुंबई – आज देशभर मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे. अशात राज्य सरकारने अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. परदेशातील लोक पाहायला येतील अशा प्रकारचं जागतिक दर्जाचं भव्यदिव्य स्मारक उभं राहणार असल्याचा विश्वास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी इंदू मिलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरु करणार असल्याचे म्हंटले आहे. जगाला हेवा वाटावा असं बाबासाहेबांचं स्मारक आपण करतोय असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच आपले लोक परेदशात जातात परंतु परदेशातून लोक इथे स्मारक पाहायला आले पाहिजेत अशा प्रकारचे जागतिक दर्जाचं भव्यदिव्य असं बाबासाहेबांचं स्मारक सरकार करणार आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले.
या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु असून तज्ञ मंडळींनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी देखील पुतळ्याची पाहणी केली आहे अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी लॉंग मार्चदरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा देखील केली.
शेतकरी कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाँग मार्चदरम्यान मृत पावलेल्या पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याचं सांगितलं. मृत पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांना यावेळी मुख्यमंत्री पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.