लखनौ – योगी आदित्यनाथ 2017 साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्याच्या विविध शहरांमध्ये तब्बल 10 हजार 933 एन्काऊंटर केले आहेत. या सर्व एन्काऊंटरमध्ये आतापर्यंत 183 गुन्हेगारांना ठार मारण्यात आल्याचीही माहिती आहे. पोलिसांची गोळी लागल्याने 5046 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व चकमकींचा विचार केला तर आतापर्यंत 23347 गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर एन्काऊंटर्सच्या घटनांमध्ये 13 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त एन्काऊंटर्स करण्यात आले आहेत. त्यानंतर प्रयागराज, कानपूर आणि लखनौ जिल्ह्यात पोलिसांनी एन्काऊंटर केले आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधील गुंडाराज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर्सचा मार्ग काढला आहे, असा आरोप समाजवादी पार्टीकडून करण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीच गुंडांना आश्रय देत असून त्यामुळेच ते एन्काऊंटरच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.
नुकताच, उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा कुख्यात गुंड अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम याला झाशीजवळील एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले. उमेश पाल हत्याकांड झाल्यापासून असद आणि गुलाम फरार होते. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाई दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी विकास दुबे या कुख्यात गुंडाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारले होते.