नगर – करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने महाराष्ट्रात गेल्या 90 दिवसांपासून सलून दुकाने बंद आहेत. त्यातून सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात केलेल्या आंदोलनावेळी केवळ आश्वासने मिळाली. मात्र, त्याचे फलित काहीच झाले नाही. परिणामी केवळ उपासमारी टाळण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. 18) महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
नगर शहरात सरकारविरोधात अलिकडेच आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. तीन दिवसानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचे आश्वासन दिल्याने त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यावर काहीच हालचाल होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी सांगितले.
महामंडळाचे पदाधिकारी सुनील वाघमारे, विकास मदने, शहाजी कदम, शरद दळवी, सुनिल खंडागळे, संजय मदने, किशोर मोरे, अनिल निकम, बापू क्षीरसागर, शिवाजी दळवी, दत्ता कदम, आबा सैंदाणे, मनोज शिंदे, नवनाथ राऊत, युवराज राऊत, संतोष ताकपेरे, विनोद साळूंखे, अरुण वाघ, दत्ता कदम व सलून व्यवसायिक या बैठकीस उपस्थित होते.
नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन नाभिक समाज महामंडळाची मागणी थेट सरकारकडे पोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आग्रहावरुनच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. 16 व 17 जून रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नाभिक समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही दिले. त्यानुसार कार्यवाही व्हावी, अशीच समाजाची अपेक्षा आहे.
त्यासंदर्भात नाभिक समाजातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यानंनी वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, सरकाराने त्याकडे सातत्याने कानाडोळा केल्याने आता तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.