प्रा.डी.के.वैद्य
अकोले – करोनामुळे अधिच प्रवाशांचा वानवा असलेल्या एसटी महामंडळ तोट्या गेले आहे. पण आहे त्या प्रवाशांनाही प्रवास आता करणे एसटीला अडचणीचे झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेलअभावी एसटी जागेवरच उभी असल्याने प्रवाशांचा खोळंबा तर झाला पण अकोले आगाराची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अकोले आगार आणि आगाराचे उत्पन्न हे तोट्याचे समीकरण बनले आहे. जोडीला वाढलेले डिझेलचे भाव या सर्वांना कारणीभूत ठरले आहेच.
एका वेळी अकोले संगमनेर अशी वाहतूक करताना 84 ते कधीकधी 100 असे प्रवासी गाडीमध्ये खचाखच भरलेले असतात पण आता ही सर्व याता-यात संगमनेर आगाराच्या नशीबी आली आहे. कारण अकोले आगाराच्या बसेस या बहुतेक वेळी ठप्प किंवा जागेवर उभ्या असलेल्या दिसतात. अकोले आगारांमध्ये चाळीस बसेस आहेत. या सर्व गाड्या डिझेलअभावी उभ्या राहण्याने व ज्या बसेस प्रवासी वाहतूक करतात.
त्यांचे भाडे उत्पन्न कमी येणे, हा सर्व आगाराचा आत बट्याचा व्यवहार सुरू आहे, असे माहिती घेता समजले.आगाराला एक दिवसासाठी 3 हजार लिटर खर्ची पडतात आणि यासाठी किमान दोन ते सव्वा दोन लाख उत्पन्न असणाऱ्या या आगाराच्या डिझेल आणि खर्चाचा ताळमेळ याचे व्यस्त प्रमाण झाले आहे. एका बाजूला 2 लाख 82 हजार रुपये डिझेल खरेदीसाठी हवे असतात. तर दुसऱ्या टोकाला दररोजचे उत्पन्न दोन ते सव्वा दोन लाखाच्या पुढे ढकलत नाही, ही खरी याबाबतची शोकांतिका आहे.
3 हजार लिटर डिझेल खरेदीसाठी 94 रुपये लिटर दराने दोन लाख 82 हजार रुपये हवे असतात असे सांगून आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड म्हणाले की, दररोजचे उत्पन्न मात्र सव्वा दोन लाखाच्या पुढे ढकलत नाही. परिणामी तूट भरून काढायला सध्यातरी पर्याय नसल्याने ग्रामीण भागातील किंवा लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्याला पर्याय उरत नाही अशी माहिती त्यांनी दिली. एकीकडे डिझेलचे भाव वाढलेले असताना भाडेवाढ मात्र नाही आणि उत्पन्नाचा आलेख हा कमी होतोय. किंबहुना करोनामुळे या तुटीच्या बजेटला आमच्या हाती महामंडळाने कोणताही पर्याय ठेवला नाही.
याकडे बोट दाखवून आगार प्रमुख आव्हाड यांनी आगाराच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्या या चालू होत नाही. याबद्दल सल व्यक्त केली. वाहक चालक व इतरांचे दोन महिन्यांपासून पगार झाले नाहीत. जुलै ऑगस्टचे पगार नाहीत. ते यथावकाश होतील. सगळ्यांना पगार मात्र मिळतोय.अशी त्यांनी माहिती दिली.
आगार परिसरात थोड्याशा आलेल्या पावसाने होणारा गाळ, त्याच्यामुळे आरोग्याची अनावस्था परिसरामध्ये दिसते. ही चिंतेची बाब ठरते आहे. करोनाचा विसर पडलेला दिसून येतो. याबाबत आव्हाड यांना छेडले असता त्यांनी प्रवाशांना घेऊन येणे याला महत्त्व दिले जात असून प्रत्येक प्रवाशाने जर आपल्या तोंडाला मास्क लावला तर बऱ्यापैकी या साथीचा प्रसार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत प्रभारी तहसीलदार ठकाजी महाले यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी आगाराला पत्र दिले जाईल. त्यांना समज दिली जाईल. आणि प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.
================