योगेश काटे
अवघा महाराष्ट्र ज्यांना आधुनिक महिपती म्हणून ओळखतो असे संतकवी, कीर्तनकार, संतचरित्रकार श्रीदासगणु महाराज यांची जयंती पौष. शु. 11 म्हणजे या वर्षी 6 जानेवारीला झाली. आजच्या वेगवान जगात त्यांचा जीवनाचा व साहित्याचा कमी वेळात परिचय करून देणे हे या लेखामागचा उद्देश. जिज्ञासू सश्रद्ध भाविकांना श्री दासगणु महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करायचा असेल तर प. पू. स्वामी वरदानंद भारती तथा पूर्वाश्रमीचे अ. दा. आठवले यांनी त्यांचे चरित्र लिहिले तसेच त्यांचे साहित्य 10 खंडात प्रसिद्ध केले.
माणूस हा नेहमीच शाश्वत सुखाच्या शोधात असतो. या धकाधकीच्या जीवनात माणूस वाटचाल करत असताना तो त्याला कसे मिळेल कुठे मिळेल याच्या शोधात असतो. ते सुख माणसाला संतांच्या सहवासातून चरित्रातून आणि साहित्यातूनच मिळते.
साहित्याकडे आपण दुर्लक्ष केले आणि व्यष्टी समष्टी तसेच राष्ट्र या पातळीवर हजारो वर्षे समाधानाच्या शोधात आहोत. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे आणि तो सोईस्करपणे वाढवला जातो की संत व त्यांचे वाङ्मय आणि त्यांच्या परंपरेतील व्यक्ती ही समाजविन्मुख आणि राष्ट्रविन्मुख तसेच माणसाला इहलोकापासून विन्मुख करणारे असते. असा अपसमज निर्माण केला गेला.
बहुतांशी भाविकांना दासगणु महाराज हे गजानन विजय या अतिशय प्रासादिक आणि भक्तरसयुक्त ग्रंथापर्यंत माहिती आहे. दासगणु महाराजांचे पूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहसत्रबुद्धे. अकोळनेरे येथील जन्म. पोलिसात नोकरी केली अन् नोकरी करत असताना त्यांना सद्गुरू मिळाले ते म्हणजे श्री वामनशास्त्री इस्लामपुरकर. त्यांनी दासगणुंना पंढरपूरची वारी करण्यास सांगितले. सद्गुरूच्या आदेशानुसार त्यांनी साईनाथांना आपल्या सद्गुरू स्वरूपात पाहिले.
त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे साईनाथांच्या आदेशानुसार रोज बारा विष्णुसहस्त्रनामाच्या पाठाची उपासना आणि कान्ह्या भिल्ल प्रकरण. कान्ह्या भिल्ल प्रकरण त्यांच्या चरित्रात वाचण्याजोगे आहे. श्री दासगुण महाराज यांनी जशी सर्व संतचरित्र आख्याने रचली तसेच काही राष्ट्रपुरूषांची कीर्तनोपयोगी आख्याने लिहिली. याचबरोबर सर्व संतांची ओवीबद्ध चरित्रे लिहिली. जसे की आद्य शंकराचार्य यांचे चरित्र. अशा ग्रंथातून महाराजांनी समाज प्रबोधन तसेच राष्ट्रीय विचार मांडले आहेत. दासगणु महाराज यांचा कालखंड हा बराचसा पारतंत्र्यात होता.
स्वातंत्र्यावर दासगणु महाराज यांनी पोवाडा केला, त्यात ते म्हणतात
स्वातंत्र्य प्राण राष्ट्राचा सर्वेतोपरी ।
ते नाही जिथे ते राष्ट्र मढ्याच्या परी ।।
पुढे दासगणु महाराज देवाला प्रार्थना करतात
कोठवरी हे दैन्य पाहसी आर्यमहिचे श्रीरंगा ।
दिनदयाळा मेघश्यामा निजुं नको रे हो जागा ।।
पू. दासगणु महाराज भक्तिमार्गी खरे, तरीही त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक धारणा कशा होत्या हे आपल्याला त्यांच्या भक्तरसायन भावप्रकाशिका यासारख्या तत्त्वज्ञान विषयक ग्रंथाच्या उपसंहाराच्या काव्यात दिसून येते. हितबोध हे पुस्तक दासगणु प्रतिष्ठानने काढले आहे.
गोरठा ता. उमरी जि. नांदेड (मराठवाडा) येथे त्यांची वस्त्रसमाधी मंदिर आहे.