क्रिकेटपटूंनी केले अनोख्या पद्धतीने आवाहन
मुंबई – भारतात करोनाचा धोका संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. त्यामुळे देशवासियांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी व सरकारच्या सूचनांचे पालन करावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजी-माजी क्रिकेटपटूंना सामावून घेत अनोख्या पद्धतीने मास्क वापरण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. या संकल्पनेचे त्यांनी टीम इंडिया नव्हे तर मास्क फोर्स असे नामकरण केले आहे.
मंडळाने केंद्र सरकारला करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 कोटी रुपयांचा निधी दिला होता, आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्यासह पुरुष संघाचेच नव्हे तर महिला संघाच्या खेळाडूंनाही सामावून घेत मास्क फोर्स स्थापन केली असून त्याद्वारे हे खेळाडू देशवासियांना मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्यातही अत्यावश्यक कामासाठी जर बाहेर पडायचेच असेल तर मात्र कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरलाच पाहिजे असा संदेश हे खेळाडू सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करुन देत आहेत. त्याबाबतचा एक व्हिडीओ मंडळाने तयार केला आहे त्यालाच टीम इंडिया असे म्हणण्याऐवजी मास्क फोर्स असे नाव दिले आहे.
या व्हिडीओत कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, हरभजनसिंग, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांनी घरीच मास्क तयार करत त्याची चित्रेही काढली आहेत. सर्वांनी घरीच मास्क तयार करा व त्याचा वापर करा असा संदेशही हे खेळाडू या व्हिडीओच्या माध्यमातून देत आहेत. तसेच केंद्र सरकार व आरोग्य मंत्रालयाने तयार केलेले आरोग्यसेतु मोबाईल ऍपही जरुर डाऊनलोड करा, असे आवाहनही मंडळाने या व्हिडीओद्वारे केले आहे.