नवी दिल्ली – जपानमध्ये आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत, त्यात भारताचा पारंपरिक खेळ खो-खोचा समावेश होईल असा आशावाद भारतीय ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त केला आहे. जपानमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत तसेच 2026 साली होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे यजमानपदही जपानलाच मिळालेले आहे.
खो-खो हा भारताचा पारंपरिक खेळ असला तरीही आजच्या घडीला जवळपास 25 ते 30 देशांमध्ये आता याचा प्रसार झाला आहे. तसेच या खेळाचे सामनेही सातत्याने आयोजित केले जातात, त्यामुळे या खेळाची वाढती लोकप्रियता पाहता व येत्या काळात हा खेळ आणखी काही देशांत खेळला जावा यासाठी जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश केला जाईल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.
2018 साली इंडोनेशियात झालेल्या आशियाई स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने या खेळाचा आशियाई स्पर्धेतील समावेशासाठी होकार दिला होता. तसेच 2022 साली चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत खो-खो या खेळाचा एक प्रदर्शनीय सामना आयोजित केला जाणार आहे. या खेळाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे भारताने दोन वेळा (1996 व 2016), तर बांगलादेशने एकदा (2000) या स्पर्धेचे आयोजन केले होते.