IND vs WI 1st T20 – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच T20 सामन्याच्या मालिकेस गुरुवारपासून (3 ऑगस्ट) प्रारंभ झाला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वेस्ट इंडिजने भारताचा अवघ्या चार धावांनी पराभव केला असून या विजयासह यजमानांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने रोमहर्षक सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विंडीज संघाने 20 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 150 धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि 20 षटकात 9 गडी गमावून 145 धावाच करता आल्या.
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नवोदित तिलक वर्मा वगळता बाकी सर्व फलंदाजांनी निराश केलं. तिलक वर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
संथ विकेटवर, सेट झाल्यानंतर भारतीय फलंदाज बाद होत राहिले. याचा फटका संघाला सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने 21, कर्णधार हार्दिक पंड्याने 19, अक्षर पटेलने 13, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंगने 12-12 धावा केल्या. इशान किशन सहा आणि शुभमन गिलने तीन धावा करून बाद झाले.
भारताला विजयासाठी शेवटच्या पाच षटकात 37 धावा करायच्या होत्या. त्यावेळी संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 113 धावा होती. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन क्रीजवर होते. इथून टीम इंडिया सहज जिंकेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. हार्दिक पांड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. त्यानंतर संजू सॅमसन धावबाद होताच संघाच्या आशा संपुष्टात आल्या.
अर्शदीपने अखेरच्या षटकात काही नेत्रदीपक फटके मारले, मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजकडून अबोद मकॉय, जेसन होल्डर आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. अकिल हुसेन याने एक विकेट घेतली.
दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) गयाना येथे होणार आहे.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने Toss जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली होती. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या तर निकोलस पूरनने 41 धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने 28 धावांचे योगदान दिले.
भारताकडून युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी दोन बळी घेतले तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.