सातारा – “सीएए’ व “एनआरसी’ कायद्याच्या विरोधात श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सातारा शहरातून आग्रह मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. “सीएए’च्या विरोधात देशभरात विरोधाचे वातावरण तयार झाले आहे. त्या कायद्याचा निषेध करण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यात आग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा दुपारी साडेबाराच्या दरम्यान राजवाडा गांधी मैदान येथून सुरू झाला. मोती चौक, देवी चौक, कमानी हौद शेटे चौक पोलीस मुख्यालयाकडून पोवई नाक्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, जनतेच्या अस्तित्वाचा उपमर्द करणारे हे विधेयक केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवरायांचा घोर अवमान केल्याबद्दल जनतेची माफी मागितली जावी, या दोन मागण्याचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये श्रमिक मुक्ती दलाचे सातशे ते आठशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.