सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम ः शिवनेरीहून निघालेल्या पालखीचे स्वागत
जुन्नर -सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड शिवरथयात्रा रविवारी (दि. 3) जुन्नरहून मार्गस्थ झाली. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेली ही पालखी उद्या (दि. 7) रायगडावर पोहचणार आहे. यावेळी श्रीमंत पिलाजीराव शिर्के यांचे 13 वंशज अमितराजे शिर्के व होळकर राजघराण्याचे (इंदोर) वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचा हस्ते राज्यातील विविध गडांवरुन आणलेले तसेच बारा ज्योतिर्लिंग व अष्टविनायक येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला तसेच शिवाई मातेचा मंदिरात महाआरती करून ओटी
भरण्यात आली.
गडावरून पालखीसोबत असलेल्या हजारो शिवभक्तांच्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते. शहरातील शिवछत्रपती कॉलेजच्या आवारात मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कबाडवाडीच्या शिवशंभो ढोल पथकच्या वतीने महाराजांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत पाडळी-बारव, राजमुद्रा युवामंच, आम्ही कबाडवाडीकर ग्रुप, स्वामी समर्थ दुकानदार संघटना, ग्रामदैवत रविवार पेठ येथे नगराध्यक्ष शाम पांडे तसेच ठिकठिकाणी या पालखीचे स्वागत करण्यात आले.
या पालखीत येणाऱ्या शिवभक्तांसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत, सचिन कदम, संचित गुंजाळ, साईलीला ग्रुप आदींनी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या. हा पालखी सोहळा बनकरफाटा, धसई, मुरबाड, म्हसा, कर्जत मार्गे पेण येथे गुरूवारी (दि. 6) महाडजवळ मुक्कामाला पोहचला होता. यात्रेचा समारोप उद्या (दि. 7) किल्ले रायगड येथे होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन- संरक्षण करणे हा सह्याद्री प्रतिष्ठान स्थापनेचा मूळ उद्देश आहे. दर रविवारी राज्यातील विविध किल्ल्यांवर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवत असतात.
-श्रमिक गोजमगुंडे, संस्थापक सह्याद्री प्रतिष्ठान.