लखनौ – करोनाचे देशभरात रोज नवे बाधित सापडण्याचा आकडा आता तब्बल दोन लाखांपर्यंत गेला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रूग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि रेमडेसिविर अशा सगळ्याच सुविधांची वानवा आहे.
डॉक्टर हवालदील झाले आहेत. रूग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी विकेंड लॉकाऊन घोषित केला आहे. देशपातळीवरही काहीतरी निर्णय एक दोन दिवसांत घेतला जाण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीच स्वयंप्रेरणने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यवहार बंद करण्यास जोरदार विरोध दर्शवला होता. महाराष्ट्रात तर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. आम्ही दुकाने उघडणारच असा निर्वाणीचा इशाराही दिला. मात्र आज प्रत्येक राज्यातील आणि प्रमुख शहरांतील स्थिती कोणाच्या नजरेतून सुटलेली नाही. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय सुविधांची मर्यादा उघड झाली आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील काही भाग, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, ओडीशा आदी राज्यांतील व्यापाऱ्यांनी स्वत:च 3 ते 7 दिवसांच्या कालावधीसाठी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, जी स्थिती आहे ती भीषण आहे. त्यामुळे दुकाने उघडून लोकांना आकर्षित करण्यात आताच्या स्थितीत काही शहाणपणा नाही.
त्यामुळे तीन ते सात दिवस आमची दुकाने बंद राहणार आहेत. केवळ लखनौच नाही तर राज्याच्या इतरही भागात हा निर्णय अमलात येणार आहे. राज्य सरकारने काही निर्णय घेण्यापूर्वीच आम्ही आमचा प्रोटोकॉल पाळत आहोत. अन्य राज्यांतही अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही चंद्रपूर येथे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.