मुंबई: करोनामुळे उभारलेल्या संकटाला सामोरे जात या परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्योग विभाग सज्ज झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. “मिशन बिगेन अगेन’च्या मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झाले आहे. एप्रिल महिन्यापासून 55 हजार 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केले आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई आणि जवळपासच्या महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव इथे अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात करणाऱ्या उद्योगांसह शेती आधारित उद्योग सुरू करण्यात आले आहेत. तसेच संरक्षण दलाला लागणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांना परवानगी दिली, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
राज्यातील उद्योगचक्र वेगाने फिरू लागले आहेत. उद्योग विभाग आणि एमआयडीसी उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. देशातील विदेशी गुंतवणुकींपैकी 33 टक्के गुंतवणूक राज्यात येते. या गुंतवणुकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचं काम सुरु आहे. रायगडमध्ये दिघी येथे 15 हजार एकरावर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. देशी आणि विदेशी 10 गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहे, त्यांना येथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
माणगावपासून मुंबई, नवी मुंबई विमानतळ जवळ आहे. तसेच जेएनपीटी बंदराचाही एमआयडीसीला उपयोग होईल. या ठिकाणी सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे माणगाव एमआयडीसीत हजारोंच्या संख्येने नवीन रोजगार उपलब्ध होतील.
दरम्यान, मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत, स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही एक पोर्टल सुरु करणार आहोत. महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्यूरो असे या पोर्टलचे नाव असेल. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.