मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून मृतांचाही आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना रुग्णायलात खाटांसाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच आयसीयू आणि व्हेंटिलेटरचीही कमतरता भासत असल्याने करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी तोंडावर काळी पट्टी आणि मास्क बांधून मूक धरणे आंदोलन केले.
राज्य सरकारने 21 मे रोजी परिपत्रक काढून खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, 14 दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खासगी हॉस्पिटलमधील रुग्ण बेड मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत. याच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांच्यासह इतर नगरसेवकांनी आंदोलन पुकारले.
करोनामुळे त्रस्त रुग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयु आणि व्हेंटिलेटर मिळाले नाही, म्हणून आजपर्यंत शेकडो गंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. भाजप गटाने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, व्हॉट्सऍप, ई मेल, ट्विट आणि प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने अद्याप खाजगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेतले नाहीत, असा आरोप केला.