प्रा. किशोर सस्ते
दोन वर्षांपूर्वी काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम वगळल्याने एकजिनसीपणा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. सरकार पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असताना दहशतवादी संघटना मात्र परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक साह्याच्या बळावर निष्पाप नागरिकांचे बळी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक साखळी तोडण्यासाठी एनआयएने काही दिवसांपूर्वी खोऱ्यात छापे घातले आणि त्यास काही प्रमाणात यश आले.
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक संघटना आणि संस्था आजही सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी संघटनांच्या शाखा म्हणून काम करतात. अर्थात, दोन वर्षांपूर्वी या संस्थेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याच्या छत्रछायेखाली अनेक संस्था काश्मीर खोऱ्यात सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहशतवाद्यांना अर्थसाह्य केले जाते. म्हणूनच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने काश्मीर खोऱ्यात तब्बल 56 ठिकाणी छापेमारी केली.
या कारवाईने दहशतवादी संघटनांची कंबर मोडली गेली आहे. काश्मीर खोऱ्यातील घातपाती कारवाया रोखण्यासाठी आर्थिक रसद तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे छापे महत्त्वाचे मानले जातात. अर्थात, या प्रकरणात अनेक वर्षांपासून कारवाई केली जात आहे.
अनेक संशयित संघटनांचे खाते बंद करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या आर्थिक मदतीवरही वॉच ठेवला जात आहे. एवढेच नाही तर हुर्रियत नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांचे खातेही सील करण्यात आली. त्याचा व्यापक परिणाम झाला आहे. आर्थिक मदत थांबल्याने काश्मीर खोऱ्यातील अनेक सक्रिय संघटना कमी झाल्या. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडून युवकांना जाळ्यात ओढण्याचे कामही कमी झाले आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या सर्वच पातळीवर मुसक्या आवळल्या जात असल्या तरी अजूनही संघटना खोऱ्यात घातपाती कारवाया करत आहेत. याचाच अर्थ त्या संघटनांची आर्थिक रसद सुरळीत सुरू आहे. त्यांच्या आर्थिक वाटा रोखण्यासाठी एनआयएने संबंधित ठिकाणांवर छापे घातले. परंतु एखाद्या संघटनांवर बंदी घालताच दुसऱ्या संघटनेच्या नावावर काम सुरू केले जाते आणि ही बाब कोणापासून लपून राहिलेली नाही. उदा., एका संघटनेने काश्मीर खोऱ्यात दुसऱ्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. त्यात केवळ दहशतवादीच तयार केले जात नाहीत तर त्यांच्या माध्यमातून संघटनांना आर्थिक मदतदेखील केली जाते.
अशीच एक तथाकथित स्वयंसेवी संस्थेवर देखील दहशतवाद्यांना आर्थिक बळ दिल्याचा ठपका आहे. त्यांच्यावरही एनआयएने टाच आणली. अशा कारवाईंमुळे दहशतवाद्यांपर्यंत पैसा पोचण्याचा मार्ग बंद होईल आणि दहशतवाद्यांच्या शाळेत मुलांना पाठवणारे पालकही वेळीच सजग होतील. काश्मीर खोऱ्यातील जनता आता हुशार झाली आहे.
फुटिरवाद्यांनी आतापर्यंत खोऱ्यातील नागरिकांची दिशाभूल करण्याचेच काम केले. भारतापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे जीवन अंधकारमय होईल, याची त्यांनाही जाणीव आहे. हत्या, गोळीबार, हिंसाचार या गोष्टी विकासाला अडसर ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांना थारा देण्याचे थांबवले आहे. याशिवाय भारत अणि पाकिस्तान यांच्यातील व्यापाराच्या देवाणघेवाणीच्या नावाखाली पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटकं भारतात आणली जातात. त्या मार्गावरही आता बंदी आणली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना मिळणारी मदत आता थांबली आहे.
सुरक्षा दलाकडून कडक निगराणी आणि व्यापक शोधमोहिमेमुळे दहशतवाद्यांची बरीचशी ठिकाणं कमी झाली आहेत. त्याचा परिणाम खोऱ्यातील दहशतवादावर होत आहे. काही ठिकाणी त्यांचे अस्तित्व जाणवते. परंतु ते स्थानिक नागरिकांवर दडपशाही करून ते गप्प राहण्यास भाग पाडत आहेत. पण ही दडपशाही फार काळ टिकत नसल्याचेही आढळून आले आहे. स्थानिक नागरिक आता पूर्वीप्रमाणे दहशतवाद्यांसमोबत दिसत नाहीत. परिणामी दहशतवादी स्थानिक लोकांना टार्गेट करत आहेत. अशावेळी एनआयएचे छापासत्र हे दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्यास साह्यभूत ठरणार आहे.