नवी दिल्ली : देशात लॉकडाऊनमुळे सर्वत्र विद्यार्थी अडकून पडले आहेत. दरम्यान, देशात विविध भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने विशेष रेल्वेची सुविधा उपलध करून दिली आहे. दरम्यान, या सरकारच्या निर्णयामुळे राजधानी दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांचा राज्यात येण्याचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रातील १६०० विद्यार्थी स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी दिल्लीत होते. लॉकडाउनमुळे सर्वजण दिल्लीमध्ये अडकून पडले होते. दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ मे रोजी दिल्ली-पुणे अशी स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. यूपीएससीच्या विद्यार्थांना दिल्लीहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ट्रेनसाठी चार थांब्याची परवानगी देण्यात आली आहे. या ट्रेनला सुरूवातीला दिल्ली ते भूसावळ अशी परवानगी देण्यात आली होती.
मात्र, आता ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळमार्गे धावणार आहे. या ट्रेनला भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे असे चार थांबे देण्यात आले आहेत. केंद्राकडून १४०० विद्यार्थांना या स्पेशल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीहून निघण्यापूर्वी आणि राज्यात पोहचल्यानंतर नियमांप्रमाणे या सर्व विद्यार्थांची वैदकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर या सर्वांना १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.